मुंबई: काँग्रेस नेते नारायण राणे आज पत्रकार परिषद घेऊन, काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे. आज अडीच वाजता कणकवलीमध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.


पण नारायण राणे एकटेच काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. त्यांचे पुत्र आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे आणि आमदार कालिदास कोळंबकर काँग्रेसचा राजीनामा देणार नाहीत.

विशेष म्हणजे नितेश राणे आणि कोळंबकर हे आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित नसतील. ते कालच मुंबईकडे रवाना झालेत.

काँग्रेसकडून शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. त्यामुळे तर नितेश राणेंनी कणकवलीतून काढता पाय घेतला नाही ना अशी चर्चा सुरु आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 5 किंवा 6 तारखेला अपेक्षित आहे. त्याआधी नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राणे नवीन पक्षा स्थापन करण्याची शक्यता त्यांच्या निकटवर्तीयांनी फेटाळून लावली आहे.