नंदुरबार : सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. तोरणमाळ घाटातील खडकी रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणारी जीप 70 फुट खोल दरीत कोसळली आहे. यात सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतकांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्यातील सीमावर्ती भागातील खडकी गावातून तोरणमाळ येथे कामाला जात असताना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे.


प्रत्यक्षादर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार मजुर घेऊन जाणारी जीप 70-80 दरीत कोसळल्याने मजुर झाडात दगडावर जोरदार आदळल्याने मृत्यू झाला. यात लहान मुलींचा देखील समावेश आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरू आहे. जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रवाशी जीप खोल दरीत कोसळल्याने प्रवाश्यांचा शोध सुरू आहे. अपघात इतका भीषण झाला आहे की प्रवाशी जीपचे सर्व भाग दरीत अस्ताव्यस्त पडलेले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. म्हसावद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. आजूबाजूचे ग्रामस्थ घटनास्थळी मदत करीत आहे. दरीतून मजुरांचे प्रेत काढण्यासाठी अवघड जात आहे. जखमींना मिळेल त्या साधनाने रूग्णालयात नेण्यात येत आहे.


हे सर्व मजूर रोजगारासाठी आपल्या सीताखाई या गावातून स्थलांतरित होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत देण्याबाबत प्रयत्न असल्याचं पालकमंत्री के. सी. पाडवी यांनी सांगितले आहे. या अपघाताने स्थलांतरितांच्या वेदना चव्हाट्यावर आले आहेत. रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू असताना हा अपघात प्रशासकीय यंत्रणेचे अपयश अधोरेखित करणारा आहे.


नंदुरबारमधील अपघातात मरण पावलेल्या आदिवासी मजुरांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये


नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळजवळ खडकी येथे मजुरांच्या वाहनाला अपघात होऊन 6 व्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यात 5 महिलांचा समावेश आहे. या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. मृत्यू पावलेले मजूर हे आदिवासी असून अतिशय दुर्गम अशा धडगाव तालुक्यातील आहेत. याशिवाय या अपघातात गंभीर व किरकोळ जखमी झालेल्या सर्वांवर उपचार सुरू असून ते देखील शासनाच्या खर्चानेच करण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. आज या घटनेची माहिती कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री के.सी. पाडवी तसेच जिल्हा प्रशासनाकडून याची माहिती घेत संपूर्ण मदत करण्याचा सूचना दिल्या.