Nanded Deglur Biloli By Election: नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या रिक्त झालेल्या जागेसाठी आज (30 ऑक्टोबर) पोटनिवडणूक पार पडली. देगलूर पोटनिवडणूक मतदान प्रक्रियेसाठी 1 हजार 677 अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. तर, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 60 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीने देखील जोमाने प्रचार करुन निवडणुकीत रंगत आणली आहे. या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. 


दरम्यान, एकूण 412 मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे. या मतदान प्रक्रीयेत 1 लाख 54 हजार 92 पुरुष मतदार, तर 1 लाख 44 हजार 256 स्त्री मतदार व इतर 5 आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी मतदाराची संख्या 187 आहे. येथील एकूण मतदारांची संख्या 2 लाख 98 हजार 540 इतकी आहे. देगलूर तालुक्यातील कासराळी येथील मतदान केंद्रांवर आज लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान, आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 60 टक्के मतदान पार पडले आहे. 


दरम्यान, देगलूर येथील मानव विकास मतदान केंद्रावर मतदारांच्या नावात घोळ असल्याने एकच गोंधळ उडाला. तसेच मतदार आणि मतदार कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली. ओळखपत्र दाखवल्यानंतरही मतदान करू दिले नाही, असा आरोप मतदारांकडून करण्यात आला आहे. 


ही पोटनिवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची ठरत आहे. निवडणुकीच्या आधी शिवसेनेत असलेले सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली. तर, दुसरीकडे काँग्रेसकडून आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना निवडणूकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांच्या अनेक दिग्गजांच्या सभा पार पडल्या. तर महाविकास आघाडीकडून मंत्री अशोक चव्हाण, छगन भुजबळ, नाना पटोले यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. वंचितकडून प्रकाश आंबेडकरांनी देखील सभा घेतल्या. 


2019 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना 89 हजार 400 मताधिक्य मिळून विजयी झाले होते. त्याचप्रमाणे त्यावेळचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार सुभाष साबणे यांना 66 हजार 560 तर वंचित बहुजन आघाडीचे तत्कालीन उमेदवार रामचंद्र भरांडे  यांना 13 हजार 300 मतदान पारड्यात पडले होते.