Nana Patole On PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या यवतमाळच्या सभेवरून महाराष्ट्र  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अनेक आरोप करत भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळच्या सभेसाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आशा सेविका, महिला बचत गटाच्या सदस्यांसह अनेकांना बसमध्ये जबरदस्तीने भरून सभेला घेऊन गेले. सोबतच, विदर्भ- मराठवाड्यातील बस मोदींच्या सभेसाठी वापरल्याने जनतेचे हाल झाले आहे. मोदींच्या सभेचा संपूर्ण खर्च हा भाजपने करण्याऐवजी, तो खर्च सरकारी तिजोरीतून करण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. केवळ पंडालवरच 12 कोटी 73  लाख 33 हजार 500 रुपये खर्च केला असून हेलिपॅडसाठी 3.5 कोटी रुपये खर्च केले आहे. सभेसाठी होणारा खर्च हा जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे, असा आरोप देखील नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.


2014 च्या हमीभावाच्या गॅरंटीचे काय झाले ?


गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, स्वयंघोषीत विश्वगुरु नरेंद्र मोदी यांच्या राजकीय सभेसाठी सरकारी यंत्रणेवर दबाव आणून गर्दी जमवण्यात आली आहे. बसमध्ये महिलांना कोंबून बसवले आहे. एखाद्या वाहनात जास्त लोक बसले तर RTO कारवाई करतात. मग यांच्यावर कारवाई कोण करणार? भाजपासाठी कायदा वेगळा आहे का? असा प्रश्न देखील नाना पटोले यांनी उपस्थित केला. जनता नरेंद्र मोदी आणि भाजपाला कंटाळली आहे. मोदींच्या सभेतील खुर्चीवर राहुल गांधी यांचे पोस्टर लावून जनतेने योग्य तो संदेश दिला आहे. याच यवतमाळमध्ये 2014 च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला दिडपट भाव देणार, स्वामीनाथन अहवाल लागू करणार, सत्तेत येताच पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर करणार, अशी आश्वासने दिली होती. परंतु सत्तेत येताच मोदी सर्व विसरले आणि तो चुनावी जुमला होता, असे म्हणून मोदींनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे आरोप देखील नाना पटोले यांनी केला. यवतमाळ संतांची भूमी आहे, संतांच्या भूमित नरेंद्र मोदी खोटे बोलले. आता यवतमाळची जनता आणि शेतकरी मोदींच्या भुलथापांना फसणार नाहीत. नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. शेतकरीच भाजपाला त्यांची जागा दाखवून देईल, असे देखील नाना पटोले म्हणाले.     


एसआयटी चौकशीआडून भाजपाचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा


महायुतीत जागा वाटपावरुन मोठा असंतोष आणि गोंधळ आहे. त्यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देऊन भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री अंतरावली सराटीत जाऊन जरांगे पाटील यांना भेटले होते. त्यानंतर नवी मुंबईत जरांगेंचे उपोषण सोडले. मुख्यमंत्र्यांचा एक ओएसडी सतत जरांगेच्या संपर्कात होता. जरांगे पाटील हे फक्त निमित्त आहेत. टार्गेट तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असे देखील नाना पटोले म्हणाले.


नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेसबरोबरच


नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटना मजबूत आहे. काहीजण भितीपोटी पक्ष सोडून गेले असले तरी कार्यकर्ते आणि जनता काँग्रेसबरोबरच आहे. नांदेड जिल्ह्यातील तिन्ही आमदार माधवराव पाटील, मोहनराव हंबर्डे, जितेश अंतापूरकर, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, शहराध्यक्ष आणि पदाधिकारी सर्वजण काँग्रेस पक्षाबरोबरच आहेत. नांदेड जिल्हा काँग्रेस विचाराचा असून लोकसभा निवडणुकीत सक्षम उमेदवार दिला जाणार आणि हा उमेदवार नक्की विजयी होणार आहे, असा विश्वास देखील नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या