भगवानगड दसरा मेळावा वादः नामदेव शास्त्रींचं मुख्यमंत्र्यांना पत्र
एबीपी माझा वेब टीम | 20 Sep 2016 08:07 PM (IST)
पाथर्डी(अहमदनगर): भगवानगडावरील दसरा मेळाव्याचा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. भगवानगडावर दसरा मेळाव्याला राजकीय, वैयक्तीक, सामाजिक मेळाव्यांना परवानगी देऊ नये, परवानगी दिल्यास कायदा सुव्यवस्थेचा अती गंभीर प्रश्न निर्माण होईल, असं गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यानी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे. भगवानगडावरील दसरा मेळाव्याला राजकीय, अतिमहत्वाच्या व्यक्तींना निमंत्रित केलेलं नाही. भगवानगड ही स्वायत्त संस्था असून वर्धापनदिनी सार्वजनिक सभा, मेळावे न घेण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही वैयक्तिक मेळावे, राजकीय मेळाव्याला परवानगी दिल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असंही निवेदनात म्हटलं आहे. यापूर्वी भगवानगड हद्दीत येणाऱ्या भारजवाडी ग्रामपंचायतीने दसरा मेळावा होण्यासाठी ठराव मंजूर केला आहे. शिवाय पंकजा मुंडेंना बोलावण्यासाठी आसपासची गावं आग्रही आहेत. त्यामुळे येत्या काळात महंत नामदेव शास्त्री विरुद्ध नागरिक असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.