नागपूर : मुंबईतील महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचं वाटप करण्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या निर्णयानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. या निर्णयावर विरोधी प्रतिक्रिया उमटल्यानंतर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


"सरकार भगवदगीतेचं वाटप करत नाही. भिवंडीची भक्ती वेदांत संस्था आमच्याकडे भगवदगीतेचं वाटप करावं, अशी मागणी घेऊन आली होती. मोफत वाटप करण्याचा त्यांचा प्रस्ताव होता. भगवदगीतेचं वाटप कोणत्या महाविद्यालयांमध्ये करावा, याबाबत उच्च शिक्षण विभागाने परिपत्रक काढलं. कुराण आणि बायबलचं वाटप करावं, अशी मागणी झाली तर तेही करु," असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

तसंच भगवदगीतेच्या 18 खंडाचं वाटपावर विरोधक आक्रमक झाले आहेत. "भगवदगीता वाईट आहे, हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवाद्यांनी जाहीर करावं. श्रीकृष्ण खोटे बोलत होते असं त्यांचं मत आहे, हे त्यांनी स्पष्ट करावं," असं आव्हानही विनोद तावडे यांनी दिलं आहे.

उच्च शिक्षण विभागाचं परिपत्रक
उच्च शिक्षण विभागाने मुंबईतील सर्व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचं वाटप करण्याची सूचना दिली आहे. याबाबत उच्च शिक्षण विभागाने एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकानुसार, मुंबई आणि मुंबई उनगरामधील ज्या महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनामध्ये A/A+ प्राप्त आहेत, अशा 100 महाविद्यालयांमध्ये आता भागवदगीतेचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी 100 भगवदगीतेचे संच संबंधित महाविद्यालयांमध्ये वाटप करण्याचे आदेश प्राचार्यांना देण्यात आले आहेत.