नागपूर : फुकट पोहे खाऊन ठेलेवाल्याकडूनच 9 हजार रुपये वसूल करणाऱ्या पोलिसाचा पर्दाफाश 'एबीपी माझा'ने केल्यानंतर, आता पोलीस खात्याला जाग आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी सुरु केली आहे.


 

वरिष्ठ अधिकारी रवींद्र सिंह यांनी स्वत: रात्री उशिरापर्यंत सीताबर्डी पोलीस स्थानकात धाव घेऊन चौकशी केली. त्यांनी पीडित मुलाला बोलावून घेऊन, त्याचं म्हणणं ऐकून घेतलं.

 

याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एका चौकशी समितीची नियुक्ती केली आहे.

 

दरम्यान पोलिसांनी पैसे उकळल्याप्रकरणी पीडित मुलाने तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप गुन्ह्याची नोंद झालेली नाही.

 

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा 15 दिवसांपूर्वी तुली इंटरनॅशनल परिसरात कार्यक्रम होता. त्यासाठी पोलीस रामदास पेठ परिसरात बंदोबस्ताला होते. बराच उशीर झाल्यानं त्यांना भूक लागली आणि त्यांनी ठेला गाठला. एका मुलाच्या ठेल्यावर पोहे आणि चहाचा नाश्ता केल्यावर बिल झालं 105 रुपये. ते या मुलानं वसूलही केलं, पण त्याची शिक्षा त्याला रविवारी मिळाली.

रविवारी मुलाला पोलिसांनी पकडून नेलं. हे ऐकताच त्याचे काका घाबरले. त्यांनी पोलीस ठाणं गाठलं, तर फुकट्या पोलिसांचा पारा चढलेला. फक्त पोह्याचे 105 रुपये घेतले, म्हणून सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडून 9 हजार रुपये वसूल केले.

या मुलाची परिस्थिती गरीबीची आहे. घरात खाणारी तोंडं जास्त. त्यामुळे दिवसभर पोह्याचा ठेला चालवायचा, आणि रात्रशाळेत शिकायचं, असा त्याचा दिनक्रम. एवढे कष्ट करुन त्याच्या नशीबी आली ती पोलिसांची मुजोरी.
पोलिसांनी अडल्या-नडलेल्यांना मदत करणं अपेक्षित आहे, इथं पोलीस फुकटेगिरीत, हप्तेखोरीत आणि खंडणीखोरीत दंग आहेत. त्यामुळे पुन्हा अशी घटना होऊ नये, असं वाटत असेल तर सीताबर्डी पोलिसांवर खंडणीखोरीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.

 

एबीपी माझा ने काल संध्याकाळी ही बातमी प्रसारित केल्यानंतर, पोलीस अधिकारी कामाला  लागले आहेत.