Nagpur News : रेल्वे प्रवासादरम्यान लोकांना खाण्यापिण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. रेल्वे प्रवासात आता प्रवाशांना आवडत असलेले स्थानिक खाद्यपदार्थ मिळणार आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी रेल्वेने प्रवास करताना आयआरसीटीसीतर्फे पुरविण्यात येणाऱ्या भोजनात मोजक्या पदार्थांचा समावेश करण्यात येत होता. मात्र आता विविध राज्यांतील प्रवाशांना त्यांच्या आवडीनुसार खाद्यपदार्थ पुरविण्याची मंजुरी भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसीला) दिली आहे. 


पदार्थ ठरविण्याची परवानगी 


  रेल्वेगाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या खान-पान सेवेत सुधारणा करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने आयआरसीटीसीला (IRCTC) अन्नपदार्थांच्या यादीतील पदार्थ ठरवण्याची परवानगी दिली आहे.  रेल्वेगाड्यांच्या तिकिटांमध्ये प्रवास शुल्कासोबत खानपान सेवेचे शुल्कदेखील समाविष्ट असते. अशा वेळी आधी सूचित केलेल्या शुल्कामध्ये दिले जाणारे अन्नपदार्थ आयआरसीटीसी निश्चित करणार आहे.


आरोग्यदायी खाद्यपदार्थाचा समावेश 


प्रादेशिक पातळीवरील वैशिष्ट्य असलेले किंवा प्राधान्य दिले जाणारे खाद्यपदार्थ, विविध ऋतूंत बनविल्या जाणाऱ्या पाककृती, सणासुदीच्या काळात मागणी असलेले पदार्थ, मधुमेहाच्या प्रवाशांना लागणारे भोजन, लहान मुलांना आवश्यक असलेले खाद्यपदार्थ, भरडधान्यावर आधारित स्थानिक खाद्यपदार्थ, आरोग्यदायी खाद्यपदार्थ आदींचा समावेश प्रवाशांच्या जेवणात व्हावा या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे.


शुल्क कोणताही बदल नाही


याशिवाय इतर मेल किंवा एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आधी सूचित केलेल्या ठराविक शुल्कामध्ये दिल्या जाणाऱ्या प्रमाणित जेवण थाळीसारख्या मर्यादित खर्चाच्या पदार्थांची निवड आयआरसीटीसीद्वारे करण्यात येणार आहे. जनता गाड्यांमधील जेवणाची यादी आणि शुल्क यांच्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच स्वतंत्रपणे मागविल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांसाठीचे शुल्क आयआरसीटीसीतर्फे निश्चित करण्यात येणार आहे.


अनधिकृत विक्रेत्यांवर अंकुश कधी?


रेल्वे गाड्यांमध्ये लहान स्टेशनमधून अनेक अवैध खाद्यपदार्थ विक्रेते चढत असतात. या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर कोणाचेही नियंत्रण नसते. तसेच याच्या दरांवरही कोणाचेही नियंत्रण नसते. विक्रेत्यांकडून  खाद्यपदार्थांची विक्री करण्यात येते. तरी अशा अवैध विक्रेत्यांवर नियंत्रणाची गरज असल्याचे प्रवाशी संघटनेने सांगितले आहे. तसेच नागपूर स्थानकावरही  निकृष्ट दर्जाच्या संत्र्यांची विक्री करणारे शेकडो तरुण सक्रिय असून याद्वारे प्रवाशांची फसवणूक होत असल्याची तक्रारही अनेकवेळा प्रवाशांनी करुनही यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. याठिकाणी सुरक्षा दलाच्या सक्रियतेवर प्रवाशांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. 


ही बातमी देखील वाचा


राज्यात गुलाबी थंडीची एन्ट्री, वेण्णा लेक परिसरात पारा 6 अंशांवर, तर नाशिकमध्ये मोसमातील निचांकी तापमानाची नोंद