Nagpur : भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे (vacancies) सरळसेवेने भरण्याकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनंतर आता तब्बल अकरा महिन्यानंतर परीक्षेचा मुहूर्त निघाला आहे. 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान नागपूरसह राज्यभरातील केंद्रांवर परीक्षा होणार आहे. यंदा ही परीक्षा आयबीपीएस (IBPS) कंपनीमार्फत घेण्यात येणार आहे.


भूमि अभिलेख विभागातील (Land Records Department) गट क पदसमूह 4 (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरता 9 डिसेंबर 2021 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार 9 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. त्यानंतर अर्जदारांना विभागाकडून 28 फेब्रुवारी ते 13 मार्च, 2022 या कालावधीत छाननी अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.


छाननी अर्ज प्रक्रियेमध्ये उमेदवार यांनी अपलोड केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. यानंतर भूमी अभिलेख विभागातील गट क पदांच्या सेवाप्रवेश नियामांनुसार जाहिरातील नमूद केलेल्या अर्हतेऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्र अपलोड करणाऱ्या उमेदवारांना अपात्र ठरवून संपूर्ण प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या 4 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत IBPS कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे.


या संकेतस्थळावरुन मिळवा परीक्षेचे प्रवेशपत्र...


परीक्षेचे विभागानिहाय वेळापत्रक (Exam Time Table) आणि उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mahabhumi.gov.in) लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पात्र उमेदवाराने संबंधित संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे. तसेच प्रवेशपत्रावर नमूद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यायची आहे. परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठीची लिंक देखील विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक जी.बी. डाबेराव यांनी दिली आहे.


युवकांना जाहिरातींची प्रतिक्षा


राज्यात दरवर्षी शासनाच्या विविध विभागातील कर्मचारी निवृत्त होत आहेत. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून नवीन भरती करण्यात आली नाही आहे. राज्य सरकारच नव्हे तर नागपूर महानगरपालिकेसह नागपूर सुधार प्रन्यास आदी विभागात खासगी एजन्सीच्यावतीने मनुष्यबळ पुरवण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेतच सध्या प्रत्येक विभागात एजन्सीची एन्ट्री झाली आहे. दुसरीकडे बेरोजगार युवकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शासनस्तरावर लवकर निर्णय घेऊन भरती करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.


ही बातमी देखील वाचा


Tech Layoffs : दिग्गज टेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना नारळ, पुढील काही आठवड्यांमध्ये पुन्हा नोकरकपात; यामागचं नेमकं कारण काय?