मुंबई : भाजपने केलेल्या सर्व्हेमध्ये आपली कामगिरी समाधानकारक असल्याचा दावा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे. रक्षा खडसे यांच्या मतदारसंघात केलेल्या सर्व्हेमध्ये 38 टक्के नागरिकांनी रक्षा खडसे यांच्या कामगिरीवर 'संतुष्ट' असल्याचं मत नोंदवलं आहे.


दिल्लीतील ‘चाणक्य’ संस्थेच्या माध्यमातून भाजपने केलेल्या सर्व्हेमधून महाराष्ट्रातील भाजपच्या 6 खासदार आणि 50 आमदारांची कामगिरी निराशाजनक असल्याचे समोर आलं होतं.



रक्षा खडसे यांच्या कामगिरीबाबत जनता समाधानी


खासदार रक्षा खडसे यांच्या कामगिरीवर त्यांच्या मतदार संघातील 38 टक्के लोक 'संतुष्ट' असल्याची माहिती भाजपच्या गुप्त सर्व्हेतून समोर आली आहे. 16 टक्के लोकांनी भामरे यांची कामगिरी 'ठिकठाक' असल्याचं म्हटलं आहे.


विशेष म्हणजे, रावेरमधील खासदार बदलला पाहिजे का, असे लोकांना विचारल्यावर, 35 टक्के लोकांनी ‘होय’ असे उत्तर दिले, तर विद्यामान खासदारांना (रक्षा खडसे) पुन्हा संधी दिली पाहिजे, असे 2 टक्के लोकांनी सांगितले. तर 9 टक्के लोकांनी ‘माहीत नाही’ असं उत्तर दिले.


भाजपकडून गुप्त सर्व्हे


दुष्काळ, महागाई, इंधन दरवाढ आणि एकंदरीत सरकारी धोरणांमुळे टीकेचं धनी बनलेलं केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारकडून जनमताची चाचपणी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील भाजप सरकारने गुपचूप सर्व्हे करुन घेतल्याचं समोर आलं आहे. दिल्लीतील ‘चाणक्य’ या संस्थेकडून केलेल्या सर्वेत, भाजपचे राज्यातील 6 खासदार आणि जवळपास 50 आमदार धोक्यात असल्याचं समोर आलं आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’ या दैनिकाने याबाबतचं वृत्त छापलं आहे.


महाराष्ट्रात केलेल्या या सर्वेनुसार भाजपच्या 121 आमदारांपैकी 40 टक्के आमदारांची कामगिरी खूपच निराशाजनक आहे.


नुकत्याच झालेल्या या सर्वेत, मतदारांना त्यांच्या मतदारसंघातील आमदार-खासदारांना रेटिंग/गुण देण्यास सांगितलं होतं. आमदार-खासदाराची कामगिरी समाधानकारक आहे की नाही?, आमदार-खासदारपदाचा उमेदवार बदलावा की कायम ठेवावा? असे प्रश्न या सर्वेत विचारण्यात आले होते.


40 टक्के आमदारांची कामगिरी निराशाजनक


भाजपच्या एका आमदाराने दिलेल्या माहितीनुसार, या सर्वेत 40 टक्के आमदारांची चार वर्षातील कामगिरी अत्यंत वाईट असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. जर उर्वरीत कार्यकाळात कामगिरी सुधारली नाही तर 2019 मध्ये त्यांच्या जागी दुसऱ्या उमेदवाराला संधी दिली जाईल, असा इशारा देण्यात आल्याचं या बातमीत म्हटलं आहे.


जवळपास 60 टक्के मतदारांनी विद्यमान आमदार-खासदारांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं आहे.


दुसरीकडे ज्या खासदारांना केवळ 19 टक्क्यांपर्यंत पसंती मिळाली आहे, त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. सध्याच्या भाजपच्या 21 खासदारांपैकी 6 खासदांचं तिकीट 2019 मध्ये कापण्याची चिन्हं आहेत.