बीड : अवघ्या तीनशे रुपयांसाठी पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई तालुक्यातील सातेफळ येथे घडली आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर दुसऱ्या राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी पतीला पोलिसांनी अवघ्या चार तासात उस्मानाबाद जिल्ह्यातून बेड्या ठोकल्या.


पती आश्रुबा नरसिंगेने दिपालीला बाजार करण्यासाठी तीनशे रुपये दिले होते. त्याचा हिशोब देण्यावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. या वादानंतर चिडलेल्या आश्रुबाने आपल्या पाच महिन्यांच्या चिमुरडीसमोरच दिपालीला विटेने मारहाण केली. बेदम मारहाणीत दिपाली रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्यानंतर आश्रुबाने घरातून पळ काढला.


काही वेळाने आश्रुबाने  दिपालीच्या चुलत्यांना फोन करुन घटनेची माहिती दिली आणि दिपाली जिवंत आहे की मेली हे जाऊन बघा असं उर्मटपणे सांगितलं. त्यानंतर दिपालीच्या माहेरचे लोक तातडीने सातेफळ येथे पोहोचले. मात्र तोपर्यंत दिपालीचा मृत्यू झाला होता.


दिपालीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी अश्रूबाला मुरुडमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हत्येचं पैशांवरून ही हत्या झाली की आणखी काह कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.


VIDEO | टॉप 25 सुपरफास्ट | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | एबीपी माझा