दहीहंडीपासून बेपत्ता असलेल्या कल्याणच्या तरुणाची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 08 Sep 2016 06:26 PM (IST)
कल्याण : दहीहंडीपासून बेपत्ता असलेल्या कल्याणच्या वडवली गावातील तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विजय भोईर असं 29 वर्षीय हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. सुपारी घेऊन विजयची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. आरोपी रफिक शेख, अक्षय भोईर आणि रवींद्र ठाकरेला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्ह्याचा मास्टरमाईंड असलेला रवींद्र ठाकरे यानं विजयला संपवण्यासाठी रफिक शेख आणि अक्षय भोईरला सुपारी दिली होती. दरम्यान विजय बेपत्ता झाल्यानंतर रफिक शेखची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र वरवर तपास करुन पोलिसांनी त्याला सोडून दिलं. त्यामुळे खडकपाडा पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे विजयची हत्या झाल्याचा आरोप कुटुबीयांनी केला आहे.