मुंबई : दहा महापालिका, 25 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. 16 आणि 21 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी, तर 21 तारखेला झालेल्या महापालिका निवडणुकांच्या मतदानाची मतमोजणी आज होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकांमध्ये पणाला लागली आहे. मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, सोलापूर, अकोला, अमरावती या दहा महापालिकांसाठी मतदान झालं.
जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, तर दुसऱ्या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मतदान झालं.
दहा महापालिकांवर कोणता झेंडा फडकणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. फक्त उमेदवारच नाही, तर राजकीय नेते आणि मतदार यांचीही उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 10 महापालिकांमध्ये 1268 जागांसाठी मतदान झालं, त्यासाठी तब्बल 9 हजार 208 उमेदवार रिंगणात आहेत.
गुरुवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी सुमारे 70 टक्के मतदान झालं आहे. यासाठी साधारणपणे दीड तासांचा वेळ लागू शकतो. म्हणजे सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत बरंचसं चित्र स्पष्ट झालेलं असेल.
राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सरासरी 56.30 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यंदा मुंबईसह सर्वच महापालिकेच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कुणाला होतो आणि फटका कुणाला बसतो हे पाहणं महत्वाचं आहे.
महापालिका (जागा) : उमेदवार रिंगणात मुंबई (227)- 2,275,
ठाणे (131)- 805,
उल्हासनगर (78)- 479,
पुणे (162)-1,090,
पिंपरी-चिंचवड (128)- 774,
सोलापूर (102)- 623,
नाशिक (122)- 821,
अकोला (80)- 579,
अमरावती (87)- 627,
नागपूर (151)- 1,135
एकूण (1,268)- 9,208
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती (एकूण जागा): उमेदवार रिंगणात रायगड (59)- 187,
रत्नागिरी (55)- 226,
सिंधुदुर्ग (50)- 170,
नाशिक (73)- 338,
पुणे (75)- 374,
सातारा (64)- 285,
सांगली (60)- 229,
सोलापूर (68)- 278,
कोल्हापूर (67)- 322,
अमरावती (59)-417,
वर्धा (2)- 8,
यवतमाळ (6)- 34
गडचिरोली (16)- 88.
एकूण (654)- 2,956.