ठाणे: मुंब्रा-बायपास हा रस्ता दुरुस्तीमुळे दोन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.  या रस्त्याचं दुरुस्तीचं काम 16 एप्रिलपासून सुरु होणार आहे.


जेएनपीटीमधून येणाऱ्या जड वाहतुकीसाठी तसंच, कल्याण, नवी मुंबई, डोंबिवली यांना ठाणे शहराशी जोडणारा हा मुंब्रा बायपास रस्ता आहे.  मात्र हाच रस्ता आता दोन महिने बंद ठेवला जाणार आहे.

मुंब्रा बायपासवर पडलेल्या खड्ड्यांमुळे इथं अनेकदा अपघात होतात. तसंच या रस्त्याखालून मध्य रेल्वे जाते, तो ब्रीज अत्यंत धोकादायक झाला आहे. त्यामुळे हे दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे.

मात्र, या दुरुस्तीच्या कामांमुळे मोठी वाहतूक कोंडी होणार आहे. त्याचा त्रास ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मुंबईतील वाहनधारकांना होणार आहे.

ठाण्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेत, नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.

दोन महिने वाहतूक बंद

  • मुंब्रा बायपासचे काम याच महिन्यात 16 एप्रिलला सुरु होईल. तब्बल 2 महिने हे काम सुरु राहील, त्याकाळात वाहतूक पूर्ण बंद ठेवण्यात येईल.

  • ठाण्यात येण्यासाठी जड वाहतूक ही ऐरोली मार्गे पूर्व द्रुतगती मार्गावर वळविण्याचा पर्याय वाहतूक विभागासमोर आहे. तर दुसरा पर्याय शीळफाटामार्गे कल्याणवरुन भिवंडीला जाणे हा आहे.

  • चार चाकी वाहने, तीन चाकी आणि दुकाची चालकांना जुना मुंब्रा गावचा रस्ता ठाण्यात येण्या-जाण्यासाठी उपलब्ध असेल.

  • जी वाहने दिवसा प्रवास करु शकत नाहीत, त्यांना पार्किंगसाठी नवी मुंबईतील सिडको तसेच मनपाच्या ट्रक टर्मिनलच्या रिक्त जागा तात्पुरत्या वापरासाठी दिल्या जाण्याचे नियोजन करण्यात येत आहे.