Pune Mumbai Sinhgad Express : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांची (Pune Mumbai Express) संख्या मोठी आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. त्यावरुन प्रवासांची भांडणंदेखील झाली. या भांडणाचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले होते. त्यामुळे प्रवाशांनी कोच वाढवण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता 1 मे पासून मध्य रेल्वेने मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसला सेकंड क्लास चेअर कोच लावण्याचा निर्णय घेतला आहे.


मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसचा हा नवा कोच (Sinhgad Express Non AC Coach) नॉन एसी कोच असणार आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसला 16 कोच असणार आहे. या ट्रेनची बुकिंग करण्यासाठी आता रेल्वे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे.


काही दिवसांपूर्वी प्रवाशांमध्ये वाद


सिंहगड एक्स्प्रेसमध्ये पासधारक आणि सामान्य प्रवासी असा हा वाद पेटला होता. मुंबई-पुणेदरम्यान धावणारी सिंहगड एक्सप्रेस 12 ऑक्टोबरला सकाळी चिंचवड स्टेशनवर येताच रेल्वेच्या बोगीत प्रवासी घुसले अन् जागा पकडण्यासाठी झुंबड उडाली होती. पासधारक प्रवासी आणि सामान्य प्रवासी यांच्यामध्ये जागा पकडण्यावरुन वाद सुरु झाला होता. हा वाद पुढे इतका वाढला की प्रवाशांमध्ये यावेळी जोरदार हाणामारी सुरु झाली होती. अगदी काही प्रवासी डब्यात खाली पडेपर्यंत ही हाणामारी झाली होती. डब्यात उपस्थित इतर प्रवाशांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद थांबला होता. 


प्रवाशांनी केली होती मागणी 


या वादानंतर आता पुन्हा एकदा पिंपरी आणि चिंचवडसाठी वेगळ्या बोगीची मागणी झाली होती. याआधी देखील अनेक वेळा पिंपरी-चिंचवड रेल प्रवासी संघटनेने स्वतंत्र बोगीसाठी रेल्वे प्रशासनाला निवेदनं दिली होती. पिंपरी आणि चिंचवडसाठी वेगळी बोगी करावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. मात्र प्रवासी संघटनेच्या मागणीला रेल्वे प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आली होती. त्यातच आता आणखी एक घटना समोर आल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली गेली. या सगळ्या घटनांनंतर आता रेल्वे प्रशासनाने वेगळा कोच लावण्याचा निर्णय घेतला आहे. 


अखेर प्रवाशांना दिलासा


मागील काही दिवसांपासून या कोचसाठी प्रवाशांकडून मागणी होत होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे शेकडो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.