Aanandacha Shidha: राज्यातील नागरिकांसाठी गौरी-गणपती सणानिमित्त सरकारकडून आनंदाचा शिधा मिळणार आहे. लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे दोन महिने बंद असणारा आनंदाचा शिधा यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव गोड होणार असून यासासाठी ५६२ कोटींचा खर्च करण्यात आला आहे.


याबाबत राज्यातील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने आदेश जारी केला असून  छत्रपती संभाजीनगर  व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील द्रारिद्य्र रेषेखालील केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतींच्या दरात हा आनंदाचा शिधा मिळणार आहे.


कधी मिळणार आनंदाचा शिधा


गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या एका महिन्याच्या कालावधीत ई- पास प्रणालीद्वारे अवघ्या १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. यावेळी द्रारिद्य्ररेषेखालील केशरी शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांना सवलतीच्या दरात आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे.


किती रुपयांचा प्रस्तावित खर्च?


आनंदाचा शिधा वितरित करण्याकरता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  अंदाजित ५४३.२१ कोटी तर इतर १९.३ कोटी खर्च असा एकूण ५६२.५१ कोटी एवढा प्रस्तावित खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.


आनंदाचा शिधा वितरित करण्याकरता आवश्यक शिधाजिन्नस खरेदी करण्याकरता २१ दिवसांऐवजी ८ दिवसांचा कालावधी देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.


काय असणार आनंदाचा शिधा?


गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा नागरिकांना एक किलो चणाडाळ, साखर व एक लिटर सोयाबीन तेल असा आनंदाचा  शिधा देण्यात येणार आहे.


कोणाला मिळणार आनंदाचा शिधा?


राज्यातील  अत्योदय अन्न योजना आणि प्राधान्यक्रम कुटुंब शिधापत्रकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर  व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील द्रारिद्य्र रेषेखालील केशरी शिधापत्रिका असणाऱ्यांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  एकूण  1,70,82,086 शिधापत्रिकाधारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त हा आनंदाचा शिधा वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.


लाेकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे आनंदाचा शिधावाटप दोन महिने बंद करण्यात आला होता. आता गणेशोत्सवाच्या काळात तो पुन्हा सुरु करण्यात येत असून यंदाच्या पावसाळी अधिवेशनात मतांच्या पेरणीसाठी आनंदाचा शिधा वाटप करत असल्याची टीका करण्यात आली होती. 


हेही वाचा:


अंगणवाडीतील खिचडीत आढळला मेलेला बेडूक, पोषण आहार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का? पालक संतप्त


वेळ कमी, लाभार्थी जास्त; 'लाडकी बहीण योजने'च्या अंमलबजावणीसाठी सरकारची अशी 'आयडिया'