मुंबई : ईव्ही ट्रान्स कंपनीला इलेक्ट्रीक बस पुरवठ्याचे कंत्राट रद्द करण्याचा एसटी महामंडळाने इशारा दिला आहे. करारानुसार बस पुरवठा होत नसल्याने कंत्राट रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 22 मे 2025 पर्यंत 1 हजार 287 ईव्ही बस पुरवण्याचा आदेश दिला असून त्याचे उल्लंघन झाल्यास कंत्राट रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.  


महामंडळ आणि कंपनीमध्ये 2 वर्षांत 5 हजार 150 बस पुरवठ्याचा करार करण्यात आला आहे. या करारानुसार महिन्याला 215 बस महामंडळास देणं अपेक्षित आहे. जानेवारी 2025 पर्यंत ईव्ही ट्रान्सकडून 1 हजार 935 बस येणं अपेक्षित होतं. पण गेल्या सहा महिन्यांत एकही गाडी एसटीच्या ताफ्यात दाखल नाही. त्यानंतर आता एसटी महामंडळाने कंपनीला कडक शब्दात इशारा दिला आहे. 


ईव्ही ट्रान्सकडून आतापर्यंत फक्त 220 बसचाच पुरवठा करण्यात आला आहे. आता 22 मे पर्यंत करारानुसार बस पुरवठा न झाल्यास कंत्राट रद्द करण्याचा इशारा महामंडळाने दिला आहे. ईव्ही ट्रान्सला महामंडळानं पाठवलेलं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. 


महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले की, "कंपनीनं ठरवून दिलेल्या गाड्या आल्या नाहीत त्यामुळे महामंडळाचे नुकसान होत आहे. पुरवठादार कंपनीनं राजकीय पक्षांना फंडिंग केलेलं आहे. मात्र, हे पत्र लिहिलं त्यासाठी अध्यक्षांचे अभिनंदनच करायला पाहिजे. आतापर्यंत फक्त 220 गाड्या आल्या आहेत. इतर 1935 गाड्यांचा पुरवठा झालेला नाही."


श्रीरंग बरगे पुढे म्हणाले की, "आता 1 हजार 287 गाड्या मे 2025 पर्यंत द्यायच्या आहेत. त्या गाड्यांचा पुरवठा कसा होणार हा प्रश्न आहे. ही निविदा रद्द होऊ शकते, प्रवासी देखील जात आहेत. यात 13 रुपये आम्हाला नुकसान आहे. यात सरकारनं व्यवहारिता निधी देखील दिलेला नाही."