MSRTC ST Bus : राज्य सरकारची प्रसिद्धी जाहिरात असलेली एसटी महामंडळाची दुरावस्था झालेल्या बसचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोची दखल घेत विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकार टीका केली होती. मात्र, जुनाट बसवर लावण्यात आलेल्या जाहिरातीसाठी एसटी कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले. भूममधील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. 


विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत बसची दुरावस्था व त्यावर शासनाची जाहिरात याचे विदारक सत्य विधीमंडळात मांडल्यानंतर खळबळ उडाली. दुरावस्था झालेल्या बसचा जाहिरातीसह फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला. अजित पवार यांनी विषय विधानसभेत मांडल्यानंतर एसटी महामंडळाकडून चांगल्या बसेस प्रवाशांच्या सेवेत येतील असे अनेकांना वाटले होते. मात्र, त्यांचा अपेक्षाभंग झाला. जाहिरातीसाठी तीन कर्मचाऱ्यांना जबाबदार ठरवण्यात आले. विशेष म्हणजे बसवर जाहिराती लावण्यासाठीचे कंत्राट दिले जाते. त्यांच्याकडून बसवर जाहिरात लावण्यात आली. त्यामुळे एसटी महामंडळाने केलेली कारवाई ही आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असल्याची टीका होऊ लागली आहे. 






कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी 


एसटी महामंडळाने केलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. बसच्या दुरावस्थेचा विषय मार्गी लागून नवीन बस मिळतील अशी आशा होती. मात्र उलट निलंबन करण्यात आल्याने नाराजी असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटले. वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने ही बस आम्ही प्रवाशांसाठी वापरण्यात आल्या. सध्या, बसचा तुटवडा आहे, त्यामुळे आमची काही चूक नाही. विनाकारण कर्मचाऱ्यांना दोषी ठरवून निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे निलंबन मागे घेण्याची मागणी करण्यात येत आहे. 


एसटी बस खरेदी करा, कर्मचाऱ्यांचा दोष काय?


एसटी महामंडळाच्या ताफ्यातील 11 हजार गाड्या दहा वर्षे पेक्षा जास्त जुन्या आहेत. नवीन गाड्या उपलब्ध नसल्याने प्रवाशांची सोय व्हावी म्हणून अशा गाड्या मार्गावर द्याव्या लागतात. यात कर्मचाऱ्यांचा काहीही दोष नाही. सरकारने बजेट मध्ये तरतूद केलेली रक्कम न दिल्याने गाड्या घेण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. यात कर्मचारी किंवा व्यवस्थापन या कुणाचाही दोष नाही असे महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले. 


सदरचे निलंबन अन्यायकारक असून यात कर्मचाऱ्यांचा काय दोष आहे, असा सवाल महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केला आहे. गेली आठ दहा वर्षापासून नवीन गाड्यांची खरेदी नाही. वेळेवर सामान पुरवठा नाही मग कामगारांनी काय करायचं? हे निलंबन ताबडतोब उठवावं यासाठी आम्ही महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना भेटून वस्तुस्थिती सांगितली आहे. त्यांनीही निलंबन उठवण्याबाबत संमती दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.