MSEDCL Load Shedding : महाराष्ट्रातील 2.8 कोटींहून अधिक ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणने मंगळवारपासून राज्यातील काही भागात लोडशेडिंग जाहीर केले आहे. मात्र या उन्हाळ्यात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईला याचा फटका बसणार नाही. असे देखील महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे


विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील काही भागांना लोडशेडिंगचा फटका बसणार


एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, ज्या ठिकाणी वीजचोरी, वीज वितरण हानी आणि बिलाची वसुली कमी आहे अशा ठिकाणी आम्ही लोडशेडिंग करू. यामध्ये G1, G2 आणि G3 श्रेणीतील ग्राहकांचा समावेश आहे, जे बहुतांशी मुंबई महानगर भागातील कल्याण भागात आहेत,” भांडुप-मुलुंड, ठाणे आणि नवी मुंबई येथे महावितरणचे भारनियमन करणार नाही, कारण या भागात वीज वितरण चांगले आहे, तसेच इतर भागांच्या तुलनेत बिल वसुली देखील उत्तम आहे असे महावितरणच्या एका अधिकाऱ्यांनी माहिती दिली. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील काही भागांना लोडशेडिंगचा सामना करावा लागणार आहे. "काही शहरी भागात, आम्ही वीज खंडित करत असलो तरीही, आम्ही ते दोन तासांपर्यंत मर्यादित ठेवण्याची योजना आखत आहोत," असे ते म्हणाले. 


2,500 ते 3,000 मेगावॅटचा तुटवडा


देशांतर्गत कोळशाच्या तुटवड्यामुळे विजेच्या पुरवठ्याच्या तुलनेत विजेच्या मागणीत अनपेक्षित वाढ झाल्याने हे लोडशेडिंग केले जात आहे. "वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आम्हाला 2,500 ते 3,000 मेगावॅटचा तुटवडा जाणवत आहे- त्यामुळेच आम्ही लोडशेडिंग करत आहोत. आमच्याकडे कोणताही पर्याय उरला नाही, तसेच ग्राहकांनी आम्हाला सहकार्य करावे," असे महावितरणच्या प्रवक्त्याने सांगितले. महावितरणच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्रातील अलीकडील वीजेची सर्वोच्च मागणी फेब्रुवारीमध्ये 26,000 मेगावॅटवरून एप्रिलमध्ये वाढून 28,000 मेगावॅटवर पोहोचली. "आम्हाला भीती आहे की मागणी लवकरच 30,000MW वर पोहोचू शकते. आमच्याकडे 33,700MW साठी वीज खरेदीचे करार असले तरी, त्यापैकी 21,057MW (62%) औष्णिक वीज केंद्रातून राज्याच्या आत आणि बाहेर खरेदी केले जातात.


वीज वाचवण्याचे आवाहन


महावितरणचे एमडी विजय सिंघल म्हणाले, कोळशाच्या कमतरतेमुळे, पुरवठा या थर्मल स्टेशन्समधून 6,000 मेगावॅटने घट झाली आहे," त्यांनी सांगितले. "आम्ही ग्राहकांना दररोज सकाळी 6 ते सकाळी 10 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत वीज वाचवण्याचे आवाहन करतो."