माढा : रामराजे निंबाळकर हे बारामतीकरांचा पट्टा गळ्यात बांधल्याप्रमाणे वागत आहेत. आपल्या जनतेचे बारामतीने नेलेले पाणी कसे पुन्हा अडवता येईल याचा प्रयत्न करीत आहेत. हे करताना ते छत्रपतींवरही टीका करत असून अशा माणसांना जोडे मारुन बाहेर हाकलून द्यावे लागेल, अशा शब्दात खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी रामराजे निंबाळकर यांच्या टिकेला उत्तर दिले आहे.


रणजितसिंह निंबाळकर यावेळी म्हणाले की, छत्रपतींच्या घराण्यावर केलेली टीका रामराजेंना शोभते का?लोकांवर टीका करताना पिसाळलेली कुत्री म्हणतात, मग आपल्यावर टीका केल्यावर का चिढता, असा टोलाही रणजितसिंह निंबाळकर यांनी लगावला.

आपल्या वाटणीचे पाणी बारामतीकरांना देताना यांना लाज वाटली नाही. आता जेव्हा सरकारने दुष्काळी जनतेला त्यांच्या हक्काचे पाणी देत आहे त्यावेळी त्यात तांत्रिक त्रुटी काढून लोकांचं नुकसान कसे करता येईल, हायकोर्टात मुद्दे कसे उपस्थित करता येतील असे घृणास्पद प्रकार रामराजे करत आहेत, असेही रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले.

मी या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो. अशा लोकांना रस्त्यावर जोडे मारले पाहिजते आणि अशा लोकांना मतदारसंघातून हाकलून लावले पाहिजे. बारामतीला पाणी कसे मिळेल यासाठी हे प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले.

आता हे पाणी बारामतीला जाणार नाही. इथल्याच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळेल, असेही ते म्हणाले.



छत्रपती असल्यासारखं वागा, सूर्याजी पिसाळासारखं वागू नका, रामराजे नाईक निंबाळकरांचा उदयनराजेंवर निशाणा

उदयनराजेंवर 302 चे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी जरा छत्रपतींसारखं वागावं, असं म्हणत रामराजे नाईक निंबाळकरांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे.  बारामतीच्या पाणीप्रश्नावरुन राष्ट्रवादीला आणि शरद पवारांना घरचा आहेर देणाऱ्या उदयनराजेंवर रामराजे निंबाळकरांनी टीका केली होती. सगळी संस्थानं खालसा झाली. संस्थानं खालसा झाल्यावर कुणी छत्रपती लावत का? आताचे छत्रपती हे स्वयंघोषित आहेत. लोकं महाराज म्हणतात म्हणून आम्ही महाराज म्हणतो. ते छत्रपतींचे वंशज आहेत हे मान्य आहे, मात्र छत्रपती असल्यासारखं वागा. कमीत कमी सूर्याजी पिसाळासारखं वागू नका, एका बाजूला एक बोलायचं दुसऱ्या बाजूला एक बोलायचं, अशा शब्दात रामराजे निंबाळकरांनी उदयनराजेंवर टीका केली होती.

उदयनराजेंनी काय केले होते आरोप

नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरुन राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला  होता. त्यांनी  राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. स्वतःच्या स्वार्थासाठी 14 वर्ष पाणी बारामतीला पळवलं. जमिनी लाटण्यासाठी काहींनी लोकांना पाण्यापासून दूर ठेवलं, असा गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे असंही उदयनराजेंनी म्हटलं होतं.

भाजप सरकारचा पवारांना दणका, बारामतीकडे वळवलेले पाणी पुन्हा दुष्काळी भागाला

माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजित निंबाळकर यांनी निवडून येताच सांगोला येथील दुष्काळी बैठकीत याबाबत आवाज उठवत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाण्याची मागणी केली होती. त्यानंतर याबाबतचा निर्णय घेत बारामतीकडे वळवलेले पाणी पुन्हा उजव्या कालव्यातील दुष्काळी भागात वळवण्यात आले आहे. या दुष्काळी भागात सांगोला, माळशिरस, पंढरपूर फलटणला या भागांचा समावेश येतो.

आता पुन्हा एकदा 1954च्या कायद्यानुसार हे पाणीवाटप करण्याचा मोठा निर्णय भाजप सरकारने घेतला. बारामतीला वळवलेले दुष्काळी भागाच्या हक्काचे पाणी पुन्हा एकदा या भागाला मिळणार असल्याने या भागातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून त्यांची तहान भागणार आहे.