कर्जमाफी घेतल्याशिवाय राहणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार
एबीपी माझा वेब टीम | 20 Mar 2017 03:30 PM (IST)
नागपूर : कर्जमाफी घेतल्याशिवाय राहणार नाही, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी निर्धार व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध करणाऱ्या अरुंधती भट्टाचार्य यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी खासदार राजू शेट्टींनी नागपुरात आंदोलन केलं. त्यावेळी ते बोलत होते. महायुतीच्या सरकारमधील मित्रपक्ष नाराज असल्याची चर्चा असताना, खासदार राजू शेट्टी यांना त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “आम्ही सरकारमध्ये असलो, तरी बाहेर आंदोलन सुरु राहील. किंबहुना, कर्जमाफी घेतल्याशिवाय राहणार नाही.” शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीला विरोध करणाऱ्या एसबीआयच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांच्या वक्तव्यानंतर आता खासदार राजू शेट्टी त्यांच्या विरुद्ध मैदानात उतरले आहेत. भट्टाचार्य यांच्या वक्तव्याचा निषेध करत राजू शेट्टींनी नागपुरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. शिवाय अरुंधती भट्टाचार्य यांचा पुतळाही जाळला.