अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना  पत्र लिहिले आहे.  जर बाळासाहेब ठाकरेंचे नाव देऊन मेळघाटचा स्काय वाँक पूर्ण होणार असेल आणि पर्यटन वाढून लोकांना रोजगार मिळणार असेल तर आमची काही हरकत असणार नाही असा टोला त्यांनी पत्रातून लगावला आहे. 


 विदर्भाच काश्मीर म्हणून ओळख असलेल्या चिखलदऱ्यात 407 मिटर लांबीचा तब्बल 34.34 कोटी रुपये खर्च करून देशातीला पहिला असा स्कायवॉक नावारूपाला येत आहे. या स्कायवॉकच्या निर्मितीनंतर चिखलदरा मधील पर्यटनाला अजून मोठी चालना मिळणार आहे. 2021 मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित असतांना मात्र, अद्यापही काम रखडले आहे. चिखलदऱ्यातील स्कायवॉकला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या, पण त्याचे काम जलदगतीने करा अशी मागणी नवनीत राणांनी आदित्य ठाकरेंकडे पत्राद्वारे केली आहे.


 तर दुसरीकडे स्काय वाँकचं काम हे सिडको अंतर्गत होत असून ते अधिकारी मात्र, काम बंद नाही फॉरेस्ट विभागाची एक एनओसी अजून मिळाली नाही ती प्रक्रियेत आहे लवकरच ती मिळेल अशी माहिती दिली. त्यामुळे सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवणाऱ्या खासदार नवनीत राणांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याची अचानक मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. यामुळे नवनीत राणा यांनी पुन्हा शिवसेनेचा चिमटा तर नाही काढला ना असा अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.