ठाणे : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये (Pahalgam Terror Attack) 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा (Maharashtra Tourist Death In Pahalgam Attack) समावेश आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठी सरकारने मोहीम सुरू केली आहे. अशात आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के (Naresh Mhaske ) यांनी भाष्य केलं. जे लोक कधीही विमानात बसले नाहीत त्यांना एकनाथ शिंदेंनी विमानात बसवून आणलं असं नरेश मस्के म्हणाले. त्यावरून आता त्यांना टीकेचा सामना करावा लागणार आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये राज्यातील सहा पर्यटकांना (Maharashtra Tourist In Jammu Kashmir)जीव गमवावा लागला. त्याचवेळी राज्यातील अनेक पर्यटक त्या ठिकाणी अडकले आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून विशेष विमानाची सोय करण्यात आली आहे. त्याचवेळी शिवसेनेची एक टीमही (Shiv Sena Rescue Team) त्या ठिकाणी पोहोचली आहे. स्वतः एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये गेले आहेत आणि अडकलेल्या पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा वेळी त्यांच्याच खासदाराने हे असंवेदनशील वक्तव्य केलं आहे.

Naresh Mhaske On Pahalgam Attack : काय म्हणाले नरेश म्हस्के? 

खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, "ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आमच पथक काश्मीरला पाठवलं. ⁠एकनाथ शिंदे स्वतः त्या ठिकाणी पोहचलेले आहेत. कोल्हापूर, केरळ आणि इर्शाळवाडी या ठिकाणी एकनाथ शिंदे सर्वात आधी पोहचून मदत करत होते. सरकार तर मदत करत आहे. ⁠जे लोक कधीही विमानात बसले नव्हते त्या लोकांना एकनाथ शिंदे यांनी विमानांत बसवून आणलं."

गरीब लोक, खाण्याचे वांदे होते, त्यांना विमानातून परत आणलं

नरेश म्हस्के म्हणाले की, "45 लोक रेल्वेने पहलगामला गेले होते. गरीब लोक, त्यांच्या खाण्याचे वांदे होते. सीआरपीएफच्या कँपमध्ये ते लोक राहत होते. त्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी विमानतळावर आणलं. ती लोक पहिल्यांदाच विमानात बसली आहेत. रेल्वेने गेलेली लोक ते घाबरलेली आहेत, पहिल्यांदा विमानात बसलेत."

सत्तेच्या उन्मादापुढे लोकांच्या भावना समजत नाहीत: सुषमा अंधारे

नरेश म्हस्के यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, "संबंध देश शोकसागरात बुडाला आहे. प्रत्येक राज्यातून कुणी ना कुणी गेलं आहे. अशावेळी भान ठेवलं पाहिजे. पण यांना सत्तेचा उन्माद इतका आहे की त्यांना लोकांच्या भावना समजत नाहीत. त्या लोकांना विमानातून परत आणला म्हणजे उपकार केलात का? मग तिकडे गेला होता कशाला? फक्त फोटोसेशन करायला गेला होता का? त्यांना परत आणण्यासाठीच गेला होतात नाही. या लोकांनी तुम्हाला मतं देऊन निवडून आणलं. त्यांना परत आणणं हे तुमचं कामच आहे."