लातूर : महाराष्ट्रात रेल्वे आणि मेट्रोचे डबे तयार करणाऱ्या पहिल्या कारखान्याचं आज लातूरमध्ये भूमीपूजन होणार आहे. या प्रकल्पातून मराठवाड्याला मोठा रोजगार मिळेल, अशी आशा आहे. जिल्हा क्रिडा संकुल येथे संध्याकाळी साडेपाच वाजता रेल्वेमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत हा भूमीपूजन सोहळा होईल.


रेल्वेतर्फे 500 कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून 25 ते 30 हजार रोजगार मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. लातूरमध्ये कोच कारखाना उभारण्याचा निर्णय यावर्षी जानेवारीमध्ये घेण्यात आला. महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांनी 20 फेब्रुवारी 2018 रोजी सामंजस्य करार केला होता.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

पहिल्या टप्प्यात प्रति वर्ष 250 डब्यांचं उत्पादन

दुसऱ्या टप्प्यात प्रति वर्ष 400 डब्यांपर्यंत उत्पादन क्षमता वाढवणे

जमीन क्षेत्र : 153.88 हेक्टर

अपेक्षित खर्च : 500 कोटी रुपये

ठिकाण : हरंगूल स्टेशनपासून 2.5 किमी अंतरावर

रेल्वे विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) द्वारे कारखाना बांधण्यात येईल

भूसर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं आहे.

फॅक्टरी लेआऊट विकसित

25 ते 30 हजार रोजगाराच्या संधी