सातारा : अनैतिक संबधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पोटच्या मुलाची महिलेने प्रियकराच्या साथीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दहा वर्षांच्या चिमुरड्याला कॅनॉलमध्ये ढकलून आरोपींनी त्याचा जीव घेतला.


माणूसकीला काळिमा फासणारी ही घटना सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील आहे. वाईमध्ये राहणाऱ्या अश्विनी चव्हाणचे बावधनमधील सचिन कुंभार याच्यासोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. अश्विनीचा मोठा मुलगा गौरव हा त्यांच्या प्रेमसंबधात अडथळा ठरत होता.

अश्विनी आणि सचिन या दोघांनी प्लॅन करुन गौरवला कॅनॉलमध्ये ढकलत त्याची हत्या केली. मुलगा हरवल्याची तक्रार तिन स्वतःच 29 एप्रिल रोजी वाई पोलिसात दिली.

त्याच दिवशी गौरवचा मृतदेह काही अंतरावर ग्रामस्थांना आढळला. मुलगा रात्रीच्या वेळी कॅनॉलवर गेलाच कसा, या प्रश्नातून पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे गौरववर अंत्यसंस्कार झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी शाळेने स्वतःहून फोन करुन पालकांना त्याचा निकाल सांगितला. गौरव 90 टक्क्यांनी पास झाला होता. मात्र गौरवचा 'गौरव' करण्यासाठी तो जगात नसल्याचं शिक्षकांना सांगण्याची वेळ कुटुंबीयांवर आली.