पाचगणीत कडकडीत बंद, 13 गावांचा मोर्चा
एबीपी माझा वेब टीम | 10 Oct 2017 02:35 PM (IST)
जवळपास 13 गावांनी एकत्र येत आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला.

सातारा: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पाचगणीत आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. गावगुंडांच्या दहशतीविरोधात स्थानिक व्यापारी, रहिवाशांनी हा मोर्चा उघडला. जवळपास 13 गावांनी एकत्र येत आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. पाचगणी आणि आजूबाजूच्या परिसरातील जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणमात बाहेरचे गुंड दहशत माजवतात. माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करतात, असा त्यांचा आरोप आहे. याशिवाय अट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करतात, कागदपत्र न तपासता अशा गाव गुंडाना बेकायदा वीज कनेक्शन दिले जाते, पोलिसांकडून न्याय मिळत नाही, अशा विविध मागण्यांसाठी आज पाचगणीत मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे आज सकाळपासून दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत, तर रस्त्यावरही शुकशुकाट जाणवत होता. या बंदचा मात्र पाचगणी फिरायला आलेल्या पर्यटकांना चांगलाच फटका बसला.