मुंबई : राजधानी दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही फटाके विक्रीवर बंदी येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली आहे.


दिल्ली एनसीआरमध्ये फटाके विक्रीवर घातलेली बंदी सुप्रीम कोर्टाने यावर्षीही कायम ठेवली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही फटाके विक्रीला बंदी येते का, हे पाहणं महत्वाचं आहे. मंत्रालयात विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ देण्यात आली, त्यावेळी रामदास कदम बोलत होते.

मंत्रालय परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळीची शपथ देण्यात आली.

दिल्लीत फटाके विक्रीवर बंदी

राजधानी दिल्लीत यावर्षी विनाफटाक्यांची दिवाळी साजरी होणार आहे. फटाके विक्रीवर गेल्या वर्षी घालण्यात आलेली बंद सुप्रीम कोर्टाने यावर्षीही कायम ठेवली आहे. पोलिसांनी दिलेले सर्व परवाने रद्द करण्यात आले आहेत.

यावर्षी 12 सप्टेंबर रोजी देण्यात आलेला आदेश 1 नोव्हेंबारपासून लागू होणार आहे. या आदेशामध्ये दिल्ली एनसीआरमध्ये काही अटींसह फटाके विक्रीला परवानगी देण्यात आली होती. मात्र आता या नव्या आदेशामुळे विक्रेत्यांना 1 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांची विक्री करता येणार नाही.