मुंबई : मुंबईसह राज्यभरात मान्सून दाखल झाल्याचे वृत्त हवामान खात्याने जाहीर केले आहे. परंतु राज्यातील अनेक भाग अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबईतल्या काही उपनगरांमध्ये आज (बुधवार) पहाटे मान्सूनच्या पहिल्या पावसाने हजेरी लावली आहे. अंधेरी, जोगेश्वरी आणि सांताक्रूझ परिसरात पावसाच्या हलक्या सरी सुरु आहेत. त्यामुळे मान्सूनची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.


आठवड्याभरापूर्वी मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश आहे. त्यानंतर काही दिवसात मान्सून राज्यभरात हजेरी लावणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार मान्सूनने राज्य व्यापले आहे. परंतु राज्यातील अनेक भागांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. परंतु नागरिक आणि शेतकरी पावसाने जोर धरण्याची वाट पाहात आहेत.

राज्यात काही ठिकाणी चांगला पाऊस सुरु असताना, दुसरीकडे महाराष्ट्राचं चेरापुंजी अशी ओळख असलेलं किटवडे गाव कोरडंठाक आहे. आंबोली घाटमाथ्यावर असलेलं किटवडे हे केवळ 700 लोकवस्तीचं गाव आहे. दरवर्षी राज्यात सर्वाधिक म्हणजे जवळपास 7 हजार मिलीमीटरहून अधिक पाऊस या ठिकाणी पडतो. पंरतु, यंदा या भागात पाऊस फिरकलेला नाही.

पावसासाठी सामुदायिक नमाज पठण
संपूर्ण महाराष्ट्रात थोड्याफार प्रमाणात पावसाने हजेरी लावली असली तरी म्हणावा तसा पाऊस अद्याप झालेला नाही. जून महिना संपत आला असला तरी पावसाने ओढ दिल्याचे चित्र सर्वत्र आहे आणि त्यामुळे रविवारी मुस्लिम बांधवातर्फे सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सोलापुरातील अहले हदीस रंगभवन ईदगाह येथे विशेष नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले होते. साश्रू नयनांनी मुस्लिम बांधवांनी पावसासाठी याचना केली.