Sushma Andhare : महाराष्ट्रातून 7 प्रकल्प बाहेर गेले, लाखो लोकांचे रोजगार गेले. गुजरातला प्रकल्प नेऊन मुंबईला दुबळे करून गुजरातला ड्रीम सिटी करायचा प्रयत्न असल्याचा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला. कोल्हापूरमध्ये महाप्रबोधन यात्रेतून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. महाराष्ट्रामध्ये जातीचे राजकारण सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला. 


शिवसेनेतून अनेकजण आले गेले, पण शिवसेनाला काही फरक पडला नाही, राज ठाकरे, भुजबळ यांनी शिवसेना संपवायचा कधी प्रयत्न केला नाही. सुषमा अंधारे म्हणाल्या की, मोदी टेलिप्रॉम्प्टरवर बोलतात आणि एकनाथ शिंदे फडणवीसांनी दिलेल्या चिठ्ठ्यांवर बोलतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. अंधारे म्हणाल्या की, माझ्या उंचीवरुनही टीका केली गेली, पण फडणवीस यांची उंची आणि वजनही माहीत आहे, पण फडणवीस यांनी नेमका कशाचा त्याग केला? 


त्या पुढे म्हणाल्या की, मी राष्ट्रवादीची कधीही सदस्य नव्हते, तरीही गुलाबराव पाटील म्हणतात, मी राष्ट्रवादीतून आले.  भाजपकडे स्वतःचे असे काय होते? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लेकरांना मांडीवर घेऊन भाजपने त्यांना मोठे केले. खोके शब्द उचारला, तर कायदेशीर कारवाई करणार असे म्हटले जाते. 


दिपक केसरकर यांचा पाहुणचार सावंतवाडीत करणार 


सुषमा अंधारे यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचाही समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, केसरकर शिक्षण मंत्री आणि शिक्षण काय तर एक्स्पोर्ट मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला. म्हणून आमदार एक्स्पोर्ट करण्याचे काम मुख्यमंत्री यांनी केसरकर यांना दिले. त्यांचा पाहुणचार सावंतवाडीत घेणार आहे. 


एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या आमदारांना होल्डवर ठेवले होते


एकनाथ शिंदे गुवाहाटीला आमदारांसोबत असताना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आपल्यासोबत येते का याची चाचपणी करत होती, पण शरद पवारांनी भाजपसोबत येण्यास नकार दिल्यानंतर मग शिंदेंना सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने ग्रीन सिग्नल दिला. राष्ट्रवादीसाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या आमदारांना होल्डवर ठेवले होते. एकनाथ शिंदे काही आमदारासोबत गेल्यावर लगेच भाजपने सत्ता स्थापन का नाही केली? 


एकनाथ शिंदेंचा गेम होण्याची वेळ जवळ आलीय


राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. त्या म्हणाल्या की, 2023 मध्ये मध्यावधी निवडणूक लागतील. सरकारमधील मंत्र्यांकडून महिलांवर होत असलेल्या असभ्य टीकांवरूनही त्यांनी टीका केली. महिलेवर कमरेखालचे वार केले जातात. मिंधे गटाचे कौटुंबिक पातळीवर टीका करायला उतरले असल्याचे त्यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या