नाशिक : चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्यानंतर नाशिकमध्ये तणावाचं वातावरण आहे. तसंच या घटनेबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात असल्याने नाशिकमधील मोबाईल इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.


मोबाईलवरुन मोठ्या प्रमाणात अफवाचं पीक पसरत असल्यामुळे नाशिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार, नाशिकमधील आमची इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. सेवा पुन्हा सुरु झाल्यावर तुम्हाला कळवण्यात येईल, असा मेसेज मोबाईल कंपन्या ग्राहकांना पाठवत आहे.

नाशिक तळेगाव प्रकरण : 15 दिवसांत आरोपपत्र दाखल करणार : केसरकर


महाराष्ट्रात पहिल्यांदाच इंटरनेट सेवा बंद

मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीर, गुजरातमध्ये इंटरनेट सेवा बंद केली होती. बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात उसळलेल्या दंगलीनंतर काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद होती. तर गुजरातमध्ये हार्दिक पटेलच्या नेतृत्त्वातील पटेल आंदोलदरम्यान इंटरनेट सेवा ठप्प होती.

नाशकात मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, जमावाचा रास्तारोको

दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त  रविंद्र सिंगल यांनी कालच दिला होता.

आंदोलनात 20 गाड्यांचा कोळसा

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या तळेगावमध्ये एका अल्पवयीन मुलाने एका चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गावकरी आक्रमक झाले आणि आंदोलनाचं लोण अख्ख्या नाशिक जिल्ह्यात पसरलं.

संतप्त जमावाकडून मुंबई-आग्रा हायवेवर रास्तारोको, वाहतूक ठप्प

नाशिकमध्ये काल दिवसभर झालेल्या आंदोलनांमध्ये सुमारे 20 गाड्यांचा कोळसा झाला. त्यात एसटी बसेस, पोलिसांच्या गाड्या आणि काही खाजगी वाहनांचाही समावेश होता. दिवसभर सुरु असलेल्या या जाळपोळीच्या सत्राने नाशिक जिल्ह्यातले 6 मार्ग जवळपास ठप्प झाले होते. त्यामुळे हजारो प्रवासी रस्त्यातच अडकून पडले होते.