Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा ठरणार असल्याचा दावा करत आणि मोठा गाजावाजा करत मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग बांधला खरा, मात्र अवघ्या काही वर्षांत या समृद्धी महामार्गाची (Samruddhi Mahamarg Cracks) दैना वेळो वेळी समोर आली आहे. अशातच आता या जागतिक दर्जाच्या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्याचं दिसून आलं. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार एबीपी माझाने जगासमोर आणला असून त्याची गंभीर दखलही तातडीने संबंधित यंत्रणांना घ्यावी लागली. मात्र तात्पुरत्या उपाययोजना केल्यानंतर आता एमएसआरडीसी (MMRDC) ने संबंधित कंत्राटदाराला धारेवर धरत संतप्त सवाल केला आहे.


समृद्धी महामार्गाच्या बांधकामात संबंधित कंत्राटदारासोबत झालेल्या करारानुसार चार वर्षांचा म्हणजेच 2026 पर्यंत दोष निवारण कालावधी आहे. असे असे असताना एवढ्या लवकर समृद्धी महामार्गाला तडे पडलेच कसे? असा सवाल करत याचं सात दिवसात उत्तर द्या. असा आदेश आता एमएसआरडीसी ने संबंधित कंत्राटदाराला दिले आहे.


समृद्धी महामार्गाच्या बांधकामात भ्रष्टाचाराचं पाणी मुरलं?


समृद्धी महामार्गावर भेगा पडल्या प्रकरणी समृद्धी महामार्गाचे त्या पॅचचे काम करणाऱ्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीला नोटीस देण्यात आली आहे. एवढ्या लवकर समृद्धी महामार्गावर तडे कसे पडले, याचं सात दिवसात उत्तर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. एमएसआरडीसी चे इंजिनियर हिमांशू पाटील यांची एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. मात्र त्यांनी कॅमेरासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. विशेष बाब म्हणजे याच मेघा इंजीनियरिंग कंपनीने भाजप पक्षाला इलेक्ट्रॉल बॉण्ड द्वारे मोठी रक्कम दिली होती. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या बांधकामात कुठेतरी भ्रष्टाचाराचे पाणी मुरलं का? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. परिणामी, पावसाळा संपल्यानंतर संपूर्ण पॅच काढून पुन्हा नव्याने करण्याचेही या नोटीस द्वारे सुचवण्यात आले आहे.


 20 वर्षे खड्डे पडत नसल्याचा दावा पहिल्या वर्षातच फेल       


तब्बल 55 हजार कोटी रूपये खर्चून मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग बांधण्यात आला. महामार्ग वाहतुकीला खुला करून अवघं एक वर्ष झालं, तोच या महामार्गाला मोठमोठाले तडे, भेगा पडल्याचं दिसतंय. त्यातच समृद्धी महामार्ग हा काही साधासुधा महामार्गही नाही. या ठिकाणी गाड्या सुपरफास्ट वेगाने धावतात. छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंजजवळ 3 सेमी रुंद आणि 50 फूट लांबीच्या भेगा पडल्या समोर आले होतं. महामार्गासाठी एम-40 ग्रेडचं सिमेंट वापरल्यास 20 वर्षे खड्डे पडत नसल्याचा दावा एमएसआरडीसीने केला होता, पण तो आता फोल ठरला आहे.


माळीवाडा इंटरचेंजजवळच पुलावर असा खड्डा पडला असून कधीही अपघात होईल अशी शक्यता आहे. समृद्धी महामार्गावरची ही भयानक अवस्था, पुलावरील रस्त्याची अवस्थाही वेगळी नाही. या ठिकाणच्या पुलावर खड्डे पडलेत. एखादं मोठं वाहन तिथून गेलं तर संपूर्ण रस्ता हलतो. पुलावरील या खड्ड्यामुळे भरधाव वाहनाचा अपघात होण्याची शक्यता आहे.


विरोधकांकडून टीकेची जोड 


एबीपी माझाच्या या बातमीनंतर चांगलीच खळबळ माजली आणि विरोधी पक्षांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, काही दिवसांपूर्वी समृद्धी भ्रष्टाचाराविषयी मी बोललो होतो. समृद्धी महामार्ग प्रकल्पला टेंडर प्रक्रियेत 23 कंपन्यांनी सहभाग घेतला होता. भ्रष्टाचार किंवा अतिरिक्त पैसा सरकारचा गेला. या प्रकल्पातून काही मंत्री आणि अधिकाऱ्यांना लाभ मिळाला असावा. गुजरातमध्ये जे इलेक्शन झालं त्यात भाजपचा खर्च हा महाराष्ट्राच्या समृद्धी महामार्गाच्या खर्चातून झाला असल्याचे ते म्हणाले.


तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, अटल सेतूचा विषय आम्ही मांडला आणि माझी टिंगल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात करत होते. समृद्धीमध्ये खूप भ्रष्टाचार झाला आहे आणि आता त्याला देखील भेगा पडल्या आहेत. या सरकारला कुठलीही लाज शरम नसल्याचे ते म्हणाले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या