अमरावती : राज्यातील सर्वाधिक वाघ असणारं क्षेत्र म्हणून मेळघाटची ओळख आहे. मात्र, याच मेळघाटात 2019 मध्ये शिवसेनेच्या वाघाला टक्कर देण्यासाठी वेगळीच व्यूहरचना आखली जात आहे. अपक्ष आमदार रवी राणा यांनी त्यांची पत्नी नवनीत कौर राणा यांना अमरावतीतून खासदार बनवण्यासाठी आणि राजकीयदृष्ट्या हाडवैरी असलेल्या शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांना धडा शिकवण्यासाठी मेळघाटात लक्ष केंद्रित केलंय.


कधीकाळी चित्रपटसृष्टीत नशिब आजमावलेल्या नवनीत कौर राणा यांना विजयी करण्यासाठी दहीहंडीच्या निमित्ताने दिग्गज अभिनेत्यांना अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी नेऊन शिवसेनेच्या वाघाला टक्कर देण्याची ही व्यूहरचना सध्या विदर्भात चर्चेचा विषय बनली आहे.

मेळघाटातील दुर्गम डोंगररांगात, दाट वनराईने वेढलेल्या धारणीत भरपावसात दहीहंडीची धूम झाली. इथल्या आदिवासींनी ज्या गोविंदाला फक्त चित्रपटात आणि टीव्हीवर पाहिलं होतं, तोच गोविंदा आज त्यांच्या समक्ष नाचला. धारणी असो, परतवाडा असो, किंवा अमरावती शहर असो.. युवकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेली आणि अनेक तास चालणारी ही दहीहंडी केवळ धार्मिक किंवा सामाजिक नाही, तर राजकीयदृष्ट्याही तेवढीच महत्त्वाची आहे.

सेलिब्रेशन झाल्यानंतर, नृत्य पार पडल्यानंतर नवनीत कौर राणा सूत्रे आपल्या हातात घेतात. वेगळा अचलपूर जिल्हा, मेळघाटातील कुपोषणमुक्ती, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती अशा स्थानिक मुद्द्यांना हात घालत लोकांचं लक्ष वेधून घेतात. 2019 ची लोकसभा निवडणूक लढून शिवसेनेचा पराभव करण्याचं आव्हानही त्यांनी दिलं. शिवाय शिवसेनेचं मुंबईचं पार्सल मुंबईला परत पाठवणार, असंही त्या म्हणाल्या.

''आम्ही दोघे जिल्ह्यातील राजकारणात एकटे आहोत. सर्व राजकीय नेते आमच्या विरोधात कट-कारस्थान करतात. आमच्या विरोधात पोलिसांचा वापर करतात. असं असलं तरी आम्हाला थेट मुख्यमंत्र्यांची साथ आहे. 2019 च्या निवडणुकात मुख्यमंत्री शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांना नाही, तर आम्हाला मदत करतील,'' असा दावाही रवी राणांनी उपस्थितांसमोर केला.

बॉलिवूडमधील अभिनेत्यांना आणून दहीहंडीच्या कार्यक्रमात जोरदार सेलिब्रेशन झालं. जोरदार म्युझिक, डान्स, ड्रामा, थ्रिल हे सर्व काही उपस्थितांना अनुभवायला मिळालं. सोबतच आदिवासींना भावेल असा इमोशनल टचही होता. तसं पाहिलं तर नवनीत कौर राणा या महाराष्ट्रातील नाहीत. मात्र, मेळघाटातील आदिवासींसोबत नाळ जोडण्यासाठी त्या रोज शेकडो लोकांसोबत सेल्फी काढतात, ऑटोग्राफ देतात आणि नंतर भाषणात भावनिक सादही घालतात. मेळघाट मागास आणि कुपोषणग्रस्त असला तरी काय झाले, मेळघाट माझे माहेर आहे... आणि एखादी मुलगी माहेरची जशी काळजी घेते तशी काळजी मी घेईल, असं आश्वासन देऊन त्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मेळघाटातील लोकांचा पाठिंबा मागतात.

दरम्यान, दहीहंडीच्या माध्यमातून सुरू असलेल्या या राजकीय प्रचार-प्रसाराचा परिणाम इथल्या युवा मतदारांवर झालेला दिसतोय. काही जण आत्तापासूनच 2019 मध्ये परिवर्तनाची गरज सांगू लागले आहेत. तर काही नवनीत कौर राणा लोकसभा निवडणुकांच्या आधी कोणत्या पक्षात जातात याची वाट पाहून अंतिम निर्णय घेऊ असं म्हणत आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठीचा राजकीय पट सजू लागला आहे. मात्र, या निवडणुकीत भाजप-शिवसेना सोबत असतील की वेगवेगळे याबद्दल अजून स्पष्टता नाही. मात्र, वाघांचं साम्राज्य असलेल्या मेळघाटात शिवसेनेच्या वाघाला जाळ्यात अडकवण्यासाठी व्यूहरचना आखली गेली आहे.