नागपूर : आपल्याच सरकारवर टीका करुन आत्मबळ यात्रा सुरु केलेल्या आमदार आशिष देशमुख यांना पक्षाने धाडलेली कारणे दाखवा नोटीस एबीपी माझाच्या हाती लागली आहे. ही नोटीस पाठवून महिना उलटल्यानंतरही देशमुख यांनी काहीच उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे आशिष देशमुख हे पक्षाविरोधात बंड पुकारणाऱ्या माजी खासदार नाना पटोलेंच्याच मार्गाने प्रवास करत असल्याचं चित्र आहे.


आशिष देशमुख यांना पाठवलेली कारणे दाखवा नोटीस

''आपण पत्रात उपस्थित केलेले मुद्दे आपल्या अंतरमनास योग्य वाटत असले तरी हे मुद्दे माध्यमांसमोर मांडल्याने पक्षशिस्तीला तडा पोहोचत आहे. जनमानसात पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागत आहे.

आपल्या मुद्द्यांबाबत आपण पक्षस्तरावर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विभागीय संघटक उपेंद्र कोठेकर यांच्याशी चर्चा करा. किंवा, शासकीय स्तरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी किंवा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बोलू शकता.

पण, अशा प्रकारे मीडियामध्ये मुद्दे उपस्थित केल्याने आपण पक्षशिस्तीबद्दल गंभीर नाही अशी शंका येते... सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा योग्य नाही...''

आपला,

राजीव पोतदार, जिल्हाध्यक्ष, भाजप

या पत्राची प्रतिलिपी मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांनाही पाठवण्यात आलेली आहे. मात्र आशिष देशमुख यांचं बंड आणि नाराजी दोन्हीही कायम आहे. एकीकडे या नोटीसला त्यांनी उत्तर दिलेलं नाही, तर दुसरीकडे त्यांनी वेगळ्या विदर्भासाठी आत्मबळ यात्रा सुरु केली आहे. जी विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन ते फिरत आहेत.

एबीपी माझाने आशिष देशमुख यांना फोनवरून जेव्हा संपर्क केला तेव्हा मी यात्रेत व्यस्त असल्यामुळे आणि नागपूरच्या बाहेर असल्यामुळे उत्तर देता आलं नाही, असं उडवाउडवीचं उत्तर त्यांनी दिलं.