औरंगाबाद : स्वतःच्या मुला-मुलींच्या लग्नात कोट्यवधींचा खर्च करणारे नेते आपण पाहिले आहेत. पैशांची उधळपट्टी करणाऱ्या या विवाहांची चर्चाही झाली. पण महाराष्ट्रात असाही एक आमदार आहे, ज्याने स्वतःच्या मुलीच्या लग्नामंडपातच अनेकांचा संसार उभा केला.


औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी ही सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नातच सामूहिक विवाह सोहळा घेत गरीब कुटुंबातील 555 मुलींची लग्न लावून दिली.

ज्या गरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबांना लग्नाचा खर्च झेपत नाही, त्यांना या सोहळ्यामुळे खुप मोठी मदत झाली आहे. यापूर्वी देखील अब्दुल सत्तार यांनी आपल्या मुलाच्या लग्नात 500 जोडप्यांचं लग्न लावून दिलं होतं.

लग्नात हेलिकॉप्टर, विमान, राजवाड्याच्या प्रतिकृती यांसाठी कोट्यवधींचा खर्च करणारे पुढारी आपण पाहिले आहेत. पण जमिनीवर राहून मातीतल्या माणसांच्या संसाराची वेल फुलवणाऱ्या या आमदारांचा आदर्श याच सोहळ्याला आलेले इतर नेतेही घेतील ही अपेक्षा...