जळगाव : कोरोना (Corona Virus) होऊन गेल्यानंतर काही दिवसांनी काही लहान बालकांमध्ये मिस म्हणजेच मल्टी सिस्टम इफ्लेमेटरी सिंड्रोम (multi system inflammatory syndrome) नावाचा आजार होत असल्याचं समोर आले आहे. जळगाव जिल्ह्यात (Jalgaon Corona Update) गेल्या काही दिवसात अशा 15 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने प्रशासनासह पालकांच्या मध्ये चिंतेचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे.


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्व सामान्य जनता चांगलीच अडचणीत आल्याचं पाहायला मिळाले होते. या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर अनेकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे. कोरोनाची दुसरी लाट गेल्या काही दिवसात ओसरत असल्याचं चित्र असताना मोठ्या माणसात म्युकरमायकोसिस  या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचं बघायला मिळत आहे. 


एकीकडे असे चित्र असताना आणि कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता त्यात लहान मुलांना अधिक धोका होऊ शकतो अशी शक्यता वर्तविली जात असतानाच या लाटेच्या अगोदरच मिस् म्हणजेच मल्टी सिस्टम इफ्लेमेटरी सिंड्रोम नावाच्या आजाराचे रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळून आल्याने प्रशासन आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरले असल्याचं पाहायला मिळाले आहे.


साधारणपणे कोरोनामुक्त झालेल्या पाच ते दहा वयोगटातील बालकांमध्ये या आजाराची लक्षणे आढळून आली आहेत.  यामध्ये प्रामुख्याने सलग तीन दिवस ताप येणे, डोळे लाल होणे,अंगावर पुरळ येणे,किडणीच्या आणि हृदयाच्या समस्या या दिसून येत आहेत.


जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर गेल्या पंधरा दिवसात काही खासगी रुग्णालयात अशा बारा ते पंधरा रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. शासकीय रुग्णालयात आतापर्यंत असा एकही रुग्ण दाखल झालेला नसला तरी पुढील काळात अशा रुग्णांची आणि कोरोना बाधित बालकांची संख्या वाढण्याचा धोका पाहता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे शंभर खाटांचा कक्ष उभारणीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यासर्वांसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.


मिस आजार हा प्रामुख्याने कोरोनामुक्त झालेल्या बालकांमध्ये दोन ते तीन महिन्यांनी आढळून येत आहे. या आजारात आतापर्यंत एकही रुग्ण दगावला नसला तरीही या आजाराकडे दुर्लक्ष करता कामा नये. सुरूवातीच्या काळातच जर याच निदान झालं तर वेळीच उपचार झाल्याने रूग्णाच्या जीविताला धोका होण्याची शक्यता कमी आहे. मात्र उशीर झाला तर मात्र लहान बालकांच्या जीवाला धोका होण्याची भीती असल्याने पालकांनी वरील लक्षणे आढळून आल्यास त्यावर तातडीने उपचार करून घ्यावे, असं आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोग तज्ञ डॉ बाळासाहेब सुरोसे यांनी केले आहे.