सांगली : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँगेस आणि राष्ट्रवादी पक्षांवर जनसंघर्ष आणि निर्धार यात्रेवरुन शेलक्या शब्दात टीका केली आहे. 'अशा यात्रा काढून काँग्रेस-राष्ट्रवादी कितीही बोंबलू दे, पण लोक म्हणतात आम्ही भाजपलाच मतदान करणार. आतापर्यंतच्या निवडणूक निकालावरुन हे दिसूनही आले आहे,' असे वक्तव्य पाटील यांनी केले आहे. इस्लामपूरमधील कृषी विभागाकडून आयोजित दख्खन यात्रा महोत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.


काँग्रेसची जनसंघर्ष तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेला कालपासून सुरुवात झाली आहे. या यात्रेतून दोन्ही पक्ष भाजपला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही पक्षांचे नेते भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत पाटील यांना सध्या चालू असलेल्या यात्रांवर प्रश्न विचारलं असता, त्यांनी काँग्रस- राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, या पक्षांनी कितीही यात्रा काढल्या तरी सामान्य माणसाला भाजप सरकारचा फायदा होत आहे. त्यामुळे एकाही निवडणुकीत भाजप पराभूत होत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे पक्ष या निकालात औषधालाही शिल्लक राहत नाही, असे ते म्हणाले. या विरोधकांच्या यात्रा कार्यक्रमातून वेगवेगळ्या यात्राची नावे आम्हाला कळाली, असा टोलाही पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला.