मुंबई : मुंबईतील इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक 2020 साली पूर्ण होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतील कुलाबा येथे झालेल्या अखंड भीम ज्योत प्रज्वलन कार्यक्रमात बोलत होते.


भाजप आमदार राज पुरोहित यांच्या प्रयत्नातून कुलाब्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर अखंड भीम ज्योत उभारण्यात आली आहे. शनिवारी अखंड भीम ज्योत प्रज्वलन आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा पार पडला.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या संविधानावर सरकार काम करत आहे. हे सरकार संविधानापासून तसूभरही दूर जाणार नाही. सरकारने बाबासाहेबांची आठवण ठेवण्यासाठी त्यांचे लंडनमधील घर घेतले आणि आता इंदू मिलमधील त्यांचे स्मारक पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक 2020 साली तयार होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

यापूर्वी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी वेळ पडलीच तर राज्य गहाण ठेवू," असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

आमदार राज पुरोहित यांच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या भीम ज्योत परिसरात लवकरच भव्य तिरंगा झेंडाही उभारण्यात येणार असल्याची माहिती आहे. या ठिकाणी देशभरातून लाखो अनुयायी भेट देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वेळ पडल्यास आंबेडकर स्मारकासाठी राज्य गहाण ठेवू : मुख्यमंत्री