औरंगाबाद : औरंगाबाद फटाके स्टॉलच्या भीषण आगीप्रकरणी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख शिवाजी झनझन यांचं निलंबन करण्यात आलं आहे. महापालिका आयुक्त ओम प्रकाश बाकोरिया यांनी झनझन यांच्या निलंबनाची कारवाई केली.


आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्याच तातडीने पोहोचणं गरजेचं होतं. मात्र, अग्निशमन दलाच्या गाड्या तब्बल 40 मिनिटांनंतर पोहोचली. यामुळे दुकानांना लागलेली आग मोठ्या प्रमाणात भडकली. यामध्ये कोट्यवधींचं नुकसान झालं. या सर्व घटनेला जबाबदार धरत महापालिका आयुक्त बकोरियांनी अग्निशमन दल प्रमुख शिवाजी झनझन यांचं निलंबन केलं.



घटना काय घडली?

औरंगाबादमधील जिल्हा परिषदेच्या परिसरात फटाक्यांची जवळपास 200 दुकानं जळून बेचिराख झाली, तर 112 वाहनं जळून खाक झाली. काल सकाळी साडे अकराच्या सुमारास फटाक्यांच्या दुकानांनी अचानक पेट घेतला. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजानं आगीची भीषणता काही क्षणातच जाणवून दिली.

शहराच्या मधोमध रहिवाशी ही दुकानं असल्याचं याची दाहकत चांगलीच जाणवली. शेकडो छोट्या-मोठ्या वाहनांची अक्षरक्षः राख होऊन कोट्यवधींचं नुकसान झालं. सुदैवानं या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही.