मुंबई : पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापूरच वीरपुत्र संग्राम पाटील यांना आज (23 नोव्हेंबर) अखेरचा निरोप देण्यात आला. निगवे खालास या त्यांच्या मूळगावी त्याच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संग्राम पाटील यांच्या आठ वर्षांच्या मुलाने त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला. आमदार ऋतुराज पाटील संग्राम पाटील यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित होते.


संग्राम पाटील हे राजौरी सेक्टर याठिकाणी कार्यरत होते. 16 मराठा अशोकचक्र बटालियनचे ते जवान होते. 21 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानच्या हल्ल्यात त्यांना वीरमरण आलं. संग्राम पाटील यांच्या पश्चात आई-वडील, धाकटा भाऊ, धाकटी बहिण, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.


दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील संग्राम पाटील आणि ऋषिकेश जोंधळे या दोन्ही शहीदांच्या कुटुंबियांना राज्य सरकरकडून प्रत्येकी एक कोटी दिले जातील, अशी घोषणा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.


पाकिस्तानच्या हल्ल्यात कोल्हापूरच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण, संग्राम पाटील शहीद



काबाडकष्ट करुन शिवाजी पाटील यांनी आपल्या तिन्ही मुलांना शिकवलं. अतिशय हळवा आणि मनमिळावू असा संग्राम यांचा स्वभाव होता. लहानपणापासूनच सैन्यात जाण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी वाटेल ते कष्ट करुन संग्राम यांनी आपलं शरीर मजबूत केलं. प्रचंड कष्ट करण्याचं बाळकडू संग्राम यांना घरातूनच मिळालं.


मे महिन्यात संग्राम हे रिटायर होऊन गावी परतणार होते. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून ते घराकडे परतले नव्हते. फोनवरुनच घरातील सगळ्याची खुशाली ते जाणून घेत असत. रिटायर झाल्यानंतरची अनेक स्वप्न संग्राम यांनी पाहिली होती. त्या आधीच त्यांच्यावर पाकिस्तानच्या हल्ल्यात ते शहीद झाले. संग्राम पाटील शहीद झाल्याची बातमी समजताच कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.


भावाला ओवाळण्याऐवजी अखेरचा निरोप देण्याची वेळ, शहीद ऋषिकेश जोंधळेंवर कोल्हापुरात अंत्यसंस्कार


ऐन दिवाळीत ऋषिकेश जोंधळे शहीद
खरंतर एकाच आठवड्यात कोल्हापूरच्या दोन सुपूत्रांना सीमेवर वीरमरण आलं. ऐन दिवाळीत कोल्हापुरातील बहिरेवाडी ऋषिकेश जोंधळे पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झाले. भाऊबीजेच्या दिवशी शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. म्हणजे एक जवान ऐन दिवाळीत आणि दुसरा जवान दिवाळी संपताच शहीद झाल्याने आणखी किती सुपूत्र आपण गमावायचे? आणखी किती शहीदांना मानवंदना द्यावी लागणार आहे? असा सवाल देखील करण्यात येत आहे.