बार्शी (सोलापूर) : मनुष्याच्या जीवनात जन्मल्यापासून ते मरेपर्यंत अनेक प्रकारचे संस्कार केले जातात. त्यामध्ये लग्नसंस्कार हा देखील आयुष्याच्या टप्प्यावरील महत्वाचा संस्कार आहे. आजवर वेगवेगळ्या ठिकाणी लग्न झालेली आपण पाहिली असतील. मात्र, भगवंताचे अधिष्ठान असलेल्या बार्शी शहरात चक्क स्मशानभूमीमध्ये विवाह सोहळा पार पडला. गणेश मंदिर ट्रस्टच्या सहकार्याने अनोखा विवाह सोहळा पार पडला. स्मशानात विवाह होण्याची कदाचित ही पहिलीच घटना असावी.


लग्नाचा मंडप, वऱ्हाडीची गर्दी, वाजंत्री, मंगल अष्टका आणि मेजवानी. एका सामान्य कुटुंबाचा विवाह हा विवाह सोहळा एका अनोख्या ठिकाणी पार पडला. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीत संपन्न झालेल्या विवाहाची पंचक्रोशीत चर्चा रंगली. कारण हा विवाह सोहळा चक्क स्मशानभूमीत पार पडला. जिथे अंत्यसंस्कार विधी होतात तिथे विवाहासारखा मंगल सोहळा साजरा झाला.

बार्शी शहरात धसपिंपळगाव रोडवर बार्शी नगरपालिकेची स्मशानभूमी आहे. पंधरा वर्षापूर्वी या भागात लहान मुले किंवा नागरिक देखील जायला भित असत. मात्र मागील सहा वर्षापूर्वीपासून बार्शीतील प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने ही स्मशानभूमी विकसीत करण्यासाठी घेतली.  त्यानंतर या स्मशानभूमीचे रुपच पालटले गेले. सुमारे एक हजाराच्या जवळपास लावलेली हिरवी झाडे, अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना बसण्यासाठी भव्य असे स्टेडियम, सहा दहनशेड, लाईट व्यस्था, न्हावी कट्टा, अंतर्गत डांबरी रस्ते, संरक्षक भिंत, लॉन आदी सुविधा  केलेल्या आहेत. बार्शीच नव्हे तर कोणत्याही स्मशानभूमीत माणूस हा आनंदाने जात नाही. कारण अंतिम संस्कारासाठी जड अंतकरणाने प्रत्येक माणूस तिकडे जात असतो. त्याठिकाणी जाणाऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हे तर मोठे दु:ख असत. त्यामुळे स्मशानात लग्न ही कल्पनाच मनाला रुचत नाही. मात्र हे बार्शीत आज प्रत्यक्षात घडले आहे.

स्मशानभूमीमध्ये उभारलेल्या या सुविधांची निगा राखण्यासाठी बार्शी व परिसरातील कोणीच तयार नव्हता.  प्रसन्नदाता ट्रस्टने नांदेड येथून स्मशान जोगी कुटुंबाला बार्शीत आणलं.  मागील काही वर्षापासून लक्ष्मण धनसरवाडकर हे कुटुंब मुला-बाळांसह या ठिकाणी रहात.  लक्ष्मण यांचे बंधू अंकुश घनसरवाडकर राहणार हदगाव जिल्हा नांदेड यांचा शुभविवाह छाया गंगाधर गंधेवाड  यांच्याबरोबर ठरला. त्या कुटुंबाच्या आग्रहाखातर हा सोहळा आज दुपारी मोक्षधाममधील मांडवात मंगलअष्टकांसह संपन्न झाला. या अनोख्या विवाह सोहळ्यांची बार्शी व परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे. या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याला राजकीय नेते, प्रशाकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.