Marathwada Rain Update : जून महिना जवळपास कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने (Rain)  शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचे चित्र आहे. दरम्यान आज छत्रपती संभाजीनगरसह (Chhatrapati Sambhaji Nagar) मराठवाड्यातील (Marathwad) हिंगोली (Hingoli), परभणी (Parbhani) जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर अनेक शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट सुद्धा टळले आहे. उर्वरित पेरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाची हजेरी...


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. लासूर स्टेशन परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. तर सिल्लोड, अजिंठा, अमसरी, शिवनाथ, भागात पावसाने हजरी लावली आहे. सोबतच कन्नड तालुक्यातील बोरसर, शेवता ताडपिंळगाव परिसरात जोरदार पाऊस पडतोय. तर शहरात देखील रिमझिम पावसाने हजरी लावली. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 


परभणीत जोरदार बरसला...


संपूर्ण जून महिना गेला, आता जुलैचा पहिला आठवडा संपत आला तरी परभणी जिल्ह्यात यंदा पावसाने दांडी मारली होती. मात्र सव्वा महिन्यांनंतर परभणी शहरासह जिल्ह्यात यंदाच्या मोसमातील पहिलाच जोरदार पाऊस पडलाय. शहरासह जिल्ह्यात मागच्या 1 तासापासून धुव्वाधार पाऊस सुरु आहे. ज्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तर सर्वसामान्य परभणीकर आणि शेतकरी वर्ग ज्या पावसाच्या प्रतीक्षेत होता तो पाऊस पडत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. सोबतच रखडलेल्या पेरण्या मार्गी लागणार आहे. 


हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी


यावर्षी पावसाने चांगलीच दांडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. जून महिना संपला तरीही जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेले होते. अशातच आज सायंकाळपासून वसमत तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यातील रिधोरा, सातेफळ, तेलगाव, बळेगाव, विरेगाव, हपसापुर, टेंभुर्णी या गावांच्या शिवारामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तर वाऱ्यासह जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. जोरदार सुरू झाल्याने उद्यापासून पेरण्यांना सुरवात होण्याची शक्यता आहे. 


वाशिम जिल्ह्यातही दमदार पावसाची हजेरी... 


पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या वाशिम जिल्ह्यात आज दुपारनंतर रिसोड, मालेगाव आणि कारंजा तालुक्यात पावसाने दमदार बॅटिंग केली आहे. जोरदार झालेल्या या पावसामुळे केदार नदीला पूर आला आहे. वाशिम जिल्ह्यात पावसाची सूरवात रिसोड तालुक्यातून झाली. त्यानंतर मालेगाव आणि कारंजा तालुक्यात देखील दमदार पाऊस बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील चार दिवसापासून जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून होती. तर आज ज्या भागात पावसाने हजेरी लावली त्या भागातील शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: