मुंबई :  मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)  प्रश्न आता पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलनं उपोषणं होत आहेत. अशातच मुंबईत मंत्रालयाच्या (Mumbai Mantralaya)  गेटवर सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन केलं. आज तिसऱ्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे आमदारांनी आंदोलन केले. या आमदारांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी हे आमदार आक्रमक झाले. मंत्रालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . मात्र हा अतिशय संवेदनशील परिसर आहे तसेच जवळ वानखेडे स्टेडियममध्ये भारत आणि श्रीलंकेचा सामना आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी आमदरांना ताब्यात घेतले यावेळी या आमदारांनी घोषणाबाजी केली. ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या.


मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या आमदारांनी मंत्रालय परिसरात आंदोलन केलं.मंत्रालयाला या आमदारांकडून रास्ता रोको  करण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलवा, अशी मागणी या आमदारांनी केली. आंदोलन करणाऱ्या या आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा यावेळी या आमदारांनी दिल्या.  आरक्षण मिळेपर्यंत माझा पक्षच नाही, अशी प्रतिक्रिया आमदार राजू नवघरे यांनी दिली आहे. तर  सरकार फक्त वेळ काढूपणा करतय, अधिवेशन का बोलावत नाही , अशी प्रतिक्रिया आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.


आमदार आझाद मैदानातील पोलीस चौकीत


मंत्रालयालयात मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या आमदारांना आझाद मैदानातील पोलीस चौकीत आणण्यात आलं आहे. या आमदारांनी मंत्रालयासमोर आंदोलन केलं होतं. तसंच राज्यपालांची देखील भेट घेतली होती. मंत्रालयात आंदोलन करत असताना या आमदारांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांना आझाद मैदानातील चौकीत आणण्यात आलं आहे.  मराठा आरक्षणांसोबत मुस्लिम, धनगरांना आरक्षण हवं, अशी प्रतिक्रिया बाबाजानी दुर्राणी यांनी दिली आहे. 


जरांगे पाटलांच्या भेटीसाठी सरकारचे शिष्ठमंडळ जाणार


मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात चांगलाच पेटला आहे. या मुद्द्यावरून राज्यभरात मराठा समाजाची आंदोलने, निदर्शने सूरू आहेत. आमदारांची घरे, पक्ष कार्यालये पेटवली जातायत.  एकूणच मराठा समाज आरक्षण घेण्याच्या मागणीवर पेटून उठला. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी जरांगे पाटलांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा नववावा दिवस आहे. जरांगेंनी काल रात्रीपासून पाणी पिणे देखील बंद केलेय. अशात आज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी सरकारचे शिष्ठमंडळ जाणार आहे.शिष्ठमंडळाकडून जरंगे पाटील यांची समजूतकाढून सरकारला थोडा वेळ देण्यातयावा यासाठी विनंती करून आंदोलन मागे घ्यावे अशीही विनंती केली जाणार आहे.