जालना :  मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यात देखील जरांगे यांच्या आंदोलनाला मोठा पाठींबा मिळत आहे. तर, आजपासून (11 सप्टेंबर) जालना शहर आणि संपूर्ण जालना जिल्ह्यातील आप आपल्या गावागावांमध्ये तालुका व जिल्ह्यात अतिशय शांततेत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तसेच, मागण्या मान्य न झाल्यास येत्या 16 सप्टेंबर रोजी संपुर्ण मराठवाड्यात चक्काजाम आंदोलन करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा आणि सकळ मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे यांनी दिली आहे. 


अंतरवाली सराटी गावात सुरु असलेल्या उपोषणावेळी ग्रामस्थांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार, अश्रूधूर गोळीबार केली असून, याची सखोल न्यायालयीन चौकशी करणे, निष्पाप गावकऱ्यावरील गंभीर गुन्हे परत घेण्यात यावे अशी मागणी मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने करण्यात येत आहे. तर, सकळ मराठा समाज व मराठा समाजाच्या विविध सामाजिक संघटना, आरक्षणाला पाठिंबा देणारे समविचारी राजकीय पक्ष आणि विविध धर्म जाती संघटना यांच्यावतीने या मागणीला पाठींबा मिळत आहे. तर, आजपासून जालना शहर आणि संपूर्ण जालना जिल्ह्यातील आप आपल्या गावागावांमध्ये तालुका व जिल्ह्यात अतिशय शांततेत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.  सतेच 16 सप्टेंबरला मराठवड्यात चक्का जामची हाक देण्यात आली आहे. 


गुन्हे मागे घेण्याची मागणी! 


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात येत होते. दरम्यान, पोलिसांकडून यावेळी लाठीमार करण्यात आला होता. ज्यात अनेक गावकरी जखमी झाले होते. तर काही पोलीस देखील गंभीर जखमी झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी गावकऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र, पोलिसांनीच लाठीमार करून जखमी केले असून, गावकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने करण्यात येत आहे. तर उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी देखील हे गुन्हे रद्द करण्याची मागणी केली आहे. 


राज्यभरात आंदोलन सुरूच...


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. कुठे साखळी उपोषण, कुठे आमरण उपोषण, तर कुठे रास्ता रोको करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी आंदोलनालात हिंसक घटना सुद्धा समोर येत आहे. विशेष म्हणजे आंदोलनाचे लोण आता गावागावात जाऊन पोहचले आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीच तापण्याची शक्यता आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


मराठवाड्यातल्या मराठा समाजाला आरक्षण दिले मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडे मारलेत का? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल