मुंबई : बााबासाहेब पुरंदरेंना (Babasaheb Purandare)  मी विरोध केला तेव्हा मला खासदार सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare)   विरोध करत दम दिला होता, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्यामुळे राष्ट्रवादीमध्ये (NCP)  मोठी खळबळ उडाली आहे.  मराठ्यांच्या विरोधातील इतिहास चुकीचा लिहिला होता त्याला मी विरोध केला. त्यावेळी तटकरेंनी मला दम देत बोलू नको सांगितलं होतं, असा दावा आव्हाडांनी केला आहे. मुंबईत  आव्हाडांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.


जितेंद्र आव्हाड म्हणाले,  मराठ्यांच्या विरोधातील इतिहास चुकीचा लिहिला होता त्याला मी विरोध केला. त्यावेळी तटकरेंनी मला दम देत बोलू नको सांगितलं होतं. मात्र शरद पवार यांनी मला सांगितलं मी तुझ्या पाठिशी तुला जे बोलायचं ते बोल असं ठामपणे सांगितलं होतं. काल परवा सुप्रिया सुळे यांच्याबद्दल तटकरेंनी मी क्षुद्र असल्यामुळे माझ्यावर टीका होत असल्याचे म्हटले होते.  हे बोलत असताना जरा मागे वळून बघितलं असतं तर तुम्हाला जी पद मिळाली ती चांगल्या चांगल्या घरण्यांना मिळाली नाहीत. आदिती तटकरेंना जिल्हापरिषदेचे अध्यक्ष म्हणून शेकापने साहेबांच्या शब्दामुळे बनवलं. तुम्हाला मंत्रिपद, पुतण्या, मुलगा, भाऊ, सगळ्यांना आमदारकी दिली तुम्हाला वेळी खासदारकी दिली.  मला न देता तुमच्या मुलीला पालकमंत्री पद दिलं.


मी शुद्र आहे : आव्हाड


आव्हाड म्हणाले,  बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणब्यांविषयी वाईट लिहिलं होतं. तेव्हा मी विरोध केला होता. तुम्ही विरोध तर केलाच नाही उलट मला वक्तव्य मागे घेण्यासाठी दम दिलात. पवार साहेबांशी बोललो आणि त्यांनी माझं वक्तव्य मागे घेतलच पाहिजे असं नाही असं सांगितलं. मी कायम बोललोय मी शुद्र आहे. मला त्याचा अभिमान आहे. शुद्र म्हणजे काय ते आधी समजून घेतलं पाहिजे. जातीय जनगणनेसाठी शुद्रांसाठी उभे राहावे लागेल. तुम्ही कधीही न वापरलेलं शस्त्र वापरलं आणि आता तुम्ही ते वापरायला नको होतं. 


मी पुरंदरे यांच्या बाबतीत अजिबात चुकलो नाही : आव्हाड


मला पवार साहेब म्हणाले होते, तटकरे आणि आणखी एक नेता सकाळी माझ्याकडे येतात आणि म्हणतात भाजपकडे चला असे म्हणतात.  मी पुरंदरे यांच्या बाबतीत अजिबात चुकलो नाही. ते पुस्तक वर्णव्यवस्थेवर अवलंबून होता.  तुम्ही पुरंदरे यांची बाजू घेतली होती.  तुमचा जी आर कामाचा काय? जाट, गुजर ही दोन मोठी आंदोलनं झाली. मराठ्यांना तुम्ही नुसती आश्वासनं देत आहे, असे आव्हाड म्हणाले. 


जाती जातीत भांडणं लावणं योग्य नाही : आव्हाड


जितेंद्र आव्हाड म्हणाले, खऱ्या अर्थाने कोणाला आरक्षणाची गरज असेल तर ती वंचित समाजाला आहे. आरक्षण म्हणजे तुमच्या आर्थिक उन्नतीचे साधन नाही. हे बाबासाहेबांनी सांगितलं होतं. गावच्या सीमेबाहेर राहणाऱ्या लोकांसाठी आरक्षण होतं त्या लोकांना बाबासाहेबांनी माणसांत आणलं. जगातील प्रत्येक राष्ट्रात आरक्षण आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळलच पाहिजे.  जाती जातीत भांडणं लावणं योग्य नाही. 


न्यायाधीश निष्पक्ष असावा : आव्हाड


मनोज जरांगेच्या भेटीसाठी न्यायमूर्ती गेले होते यावर देखील आव्हाडांनी टीका केली आहे. आव्हाड म्हणाले, मला आश्चर्य वाटत की, आंदोलन शांत करण्यासाठी न्यायाधीश जातात. न्यायाधीश निष्पक्ष असावा. तो कोणाचाही नसावा असं जागतिक मत आहे. कोर्ट रूममध्ये जाताना त्यांनी एकही पेपर वाचलेला नसावा असा जागतिक नियम आहे. दोन निवृत्त न्यायाधीश यांनी जाणे त्यांच्या धर्माला शोभणारा नाही. ज्याला कोर्टात लॉर्ड म्हणतात त्यांनी समोरच्याला सर म्हणणं माझ्या दृष्टीने तरी योग्य नाही  निवृत्त असला तरी न्यायाधीशाला काही अधिकार असतात हे चुकीचं आहे, असे देखील आव्हाड म्हणाले.