मुंबई : एका बाजूला राज्यात मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन तीव्र होत असताना दुसरीकडे राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनवर भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असताना दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांनी 'सागर' बंगल्यावर सुरू असलेल्या भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीच्यावेळी हजेरी लावली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात 'वर्षा'वर बैठक होणार असल्याची माहिती आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवन येथे दाखल झाले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अचानक राज्यपालांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे हे एकटेच राज्यपालांच्या भेटीला गेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांशी जवळपास अर्धा तास चर्चा केली. राजभवन मधून बाहेर पडताना मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही. तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपच्या कोअर समितीची बैठक सागर बंगल्यावर सुरू आहे. या बैठकीतही मराठा आरक्षणावर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


सागर बंगल्यावरील बैठकीच्यावेळी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे यांनीदेखील हजेरी लावली. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यानंतर ओबीसी समुदायाची काय भूमिका असेल, याबाबत चर्चा झाली असल्याची चर्चा आहे. 


मराठा आंदोलनाच्या आंदोलनाचा वणवा पेटत असून बीडसह काही ठिकाणी हिंसक आंदोलन होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार, नेते यांना लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर या हिंसाचाराचे लोण राज्यभरात पसरू नये यासाठी राज्य सरकारकडून तातडीच्या हालचाली सुरू झाल्याचे वृत्त आहे. 


11 हजार 530 जणांना कुणबी दाखले देणार


न्या शिंदे  समितीने 1 कोटी 72 लक्ष नोंदी या समितीने तपासल्या आहेत. त्यात 11 हजार 530 नोंदी मिळाल्या आहेत. ज्यांच्या कुणबी नोंदी (Kunbi Certificate)  सापडल्या आहेत त्यांना दाखले देणार आहोत. याबाबत तहसीलदारांची बैठक घेऊन मंगळवारपासून (31 ऑक्टोबर) दाखले द्यायला सुरू करणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते.  


बीडमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदीचा आदेश लागू


बीड शहर (Beed Maratha Reservation)  प्रत्येक तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत त्यासोबतच जिल्ह्यातील प्रमुख नॅशनल हायवे वरती संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलन (Maratha Reservation Protest) पेटलं असून सोमवारी दिवसभर अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू करण्यात आलं आहे. 


बीड शहरात सोमवारी दिवसभरात घडलेल्या आंदोलन आणि विघातक घटनेमुळे आतापासून पुढल्या अनिश्चित काळापर्यंत ही जमावबंदी करण्यात आली आहे. बीड शहर तसेच तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंतच्या परिसरामध्ये जमावबंदी आदेश म्हणजे कलम 144 बीडच्या कलेक्टर दीपा मुधोळ मुंडे यांच्या आदेशाने लागू झाले आहे. बीडमध्ये सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचं मोठं नुकसान होत असल्याने हा निर्णय घेतला आहे.