मुंबई : मराठा आरक्षण विधेयक आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आलं. मराठा समाजासाठी हा महत्त्वाचा दिवस आहे. आरक्षण जाहीर झालं असलं तरी जोपर्यंत आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतला होता, मात्र उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं.


मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून गेले 10 दिवस मुंबईतील आझाद मैदानात उपोषण केलं जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यावरही मराठा ठोक मोर्चाने आपलं उपोषण सुरुच ठेवलं आहे.  मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालांची सही झाल्यानंतरच उपोषण सोडणार असल्याचं ठोक मोर्चाकडून जाहीर करण्यात आलं. सोबतंच मराठा ठोक मोर्चाने काही मागण्याही केल्या आहेत.

मराठा मोर्चावेळी दाखल करण्यात आलेले 13700 मराठा आंदोलकांवरचे गुन्हेही आजच मागे घ्या, ही महत्त्वाची मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली आहे. तसंच मराठा आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्यांच्या मराठा समाजातील कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख आणि कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची मागणीही ठोक मोर्चाकडून करण्यात आली आहे.

सोबतच अट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती आणि शेतकऱ्यांना सरकसकट कर्जमाफी यासारख्या मागण्याही उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत.

या उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आझाद मैदानात जाणार आहेत.