Manoj Jarange Patil : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे कर्जमाफी (debt relief)  देणार नाही असं म्हणत असतील तर यांच्याकडे एकदा बघावं लागेल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी यांना गावोगावी येणच बंद करायला पाहिजे असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. पुढच्या काळात मला कर्जमुक्तीच आंदोलन हाती घ्यावे लागेल असेही ते म्हणाले. 

शेतकऱ्यांनी एकजूट दाखवण्याची गरज 

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार नसतील तर यांच्याकडे बघावं लागणार आहे. त्यांना गावात यायचं बंद करावे लागेल, ती मोहीम मला सुरु करावी लागणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. मराठ्यांच्या आरक्षणानेन एकजुटीची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा एकजूट दाखवण्याची गरज आहे. 

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?

विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या होत्या. आर्थिक शिस्त गरजेची असते. त्याप्रमाणे मी अर्थसंकल्प सादर केला. विरोधकांनी जी टीका करायची ती केली. आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केला. मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो, मला थोडीशी तरी अक्कल आहे. सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही. काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफी बाबत वक्तव्य केले होते. मी राज्यातल्या जनतेला सांगतो 31 तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा. जे आधी सांगितलं होतं, ते प्रत्यक्षात येत नाही.आता तशी परिस्थिती नाही भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ. या वर्षी आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही, तशी आपली परिस्थिती नाही, असं स्पष्टपणे अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलं आहे. ते बारामतीमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलत होते.

राज्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमार्फत शेती पीकासाठी कर्ज दिलं जातं. यामध्ये सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेमार्फत होते. फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी कर्ज भरत असतात. मात्र, सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलं होतं. त्यामुळे पुन्हा सत्तेत आलेलं महायुती सरकार कर्जमाफी करेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास आखडता हात घेतला आहे. मात्र, अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.