जालना : मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही वेळेपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक असल्याची माहिती दिली. तसेच काही आश्वासन देखील यावेळी देण्यात आले आहेत. मात्र, सरकारची ही भूमिका म्हणजे पहिलेच पाढे त्यांनी वाचले असल्याची प्रतिक्रिया उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी दिली आहे. 


दरम्यान, माध्यमांशी बोलतांना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी केलेली मागणी आतापर्यंत अंमलबजावणीला गेली नाही. सरकारच्या बैठकीत आरक्षणाबाबत निर्णय झाला नसावा असं वाटतंय. त्याची लोक आल्यावर अधिकृत माहिती मिळेल. सरकारने मराठा आरक्षणाचा आदेश घेऊन यावा, उगाच बैठका आणि चर्चेचे गुऱ्हाळ करू नये. सरकारचा अधिकृत निरोप काय येतो हे पहावे लागेल असे जरांगे म्हणाले. 


तर सरकारवर अविश्वास दाखवण्यापेक्षा, सरकार सकारात्मक निर्णय घेत असेल तर आम्ही त्यांची वाट पाहू. आम्ही सरकाच्या शिष्टमंडळाच्या निर्णयाची आतुरतेने वाट बघतोय. पण आरक्षणाचा जीआर आल्याशिवाय आंदोलन संपणार नाही. आज जर यावर निर्णय झाला नाही, तर उद्यापासून मी पाणी पिण्याचं देखील बंद करणार असल्याचे उपोषणकर्ते मनोज जरांगे म्हणाले आहेत. 


फडणवीसांनी माफी मागितली...


जालना जिल्ह्यातील अंतरवाली सुराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमार प्रकरणी आणि एकूणच मराठा आरक्षणप्रकरणी सरकारच्या वतीने काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेण्यात आली. दरम्यान यावेळी बोलतांना लाठीमार झाल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. सोबतच जालना प्रकरणात लाठीमार करणाऱ्यांची चौकशी करून, कडक कारवाई करण्याचं आश्वासन सुद्धा यावेळी त्यांनी दिलंय. 


दरम्यान याच पत्रकार परिषेदत बोलतांना अजित पवार म्हणाले की, जालना येथील लाठीमार करण्यात आल्याचा प्रकार चुकीचाच होता. मात्र आंदोलन करतांना एसटी जाळण्यात आल्याचे समोर येत असून, त्यामुळे राज्याचे नुकसान झाले आहे. यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. आज जी बैठक झाली त्यात सकारात्मक चर्चा झाली. काल मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. लवकरच तोडगा निघेल, मात्र तोपर्यंत शाांतता राखा, असे आवाहन अजित पवारांनी केले आहे.


इतर बातमी: 


मराठा आरक्षण महाविकास आघाडीने घालवलं; त्या काळचे मंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसून देवेंद्र फडणवीसांचा आरोप, फडणवीसांचा निशाणा कुणावर?