Manipur Protest:  मणिपूरमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये झालेल्या (Manipur Violence) संघर्षातून दोन आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण समोर आले. त्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातही या घटनेच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. नंदूरबार, सोलापूर, गोंदिया, बीड अशा विविध जिल्ह्यांमध्ये आज निदर्शने, मोर्चाच्या माध्यमातून अत्याचाराचा निषेध करण्यात आला. 


मंगळवारी, 25 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्यावतीने मणिपूरमधील घटनेच्या विरोधात मौन पाळून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. तालुका, जिल्हास्तरावर महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर काळी फित बांधून या घटनेचा तीव्र निषेध करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहेत. 


मणिपूरमध्ये उसळलेली दंगल, महिलांवर होत असलेले अत्याचाराच्या विरोधात राज्यातील प्रागतिक पक्षांच्या आघाडीने 25 जुलै रोजी आंदोलनाची हाक दिली आहे. मणिपूरमध्ये मागील डीच महिन्यांत हिंसाचारात 150 बळी गेले, 60 हजार लोक बेघर झाले, पाच हजार जाळपोळी झाल्या, तरीही पंतप्रधान एक अक्षरही बोलले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर नाईलाजाने कारवाईची घोषणा केली. या सर्वच घटना अत्यंत वेदनादायक व संपूर्ण देशाला शरमेने मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत, असे प्रागतिक पक्षांनी म्हटले. प्रागतिक पक्षांच्या या आघाडीमध्ये राज्यातील शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, स्वाभिमानी पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटना, मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी महाराष्ट्र, बहुजन विकास आघाडी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, भाकपा (माले) लिबरेशन पार्टी, रिपाई (सेक्युलर) पार्टी व श्रमिक मुक्ती दल हे तेरा घटक पक्ष सहभागी आहेत. 


बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांचे आक्रोश आंदोलन


मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. त्या ठिकाणी तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी या मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी आक्रोश आंदोलन केलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले. र दुसरीकडे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशांमध्ये अशा घटना घडत असल्याचे आंदोलकांनी म्हटले असून केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. 


हिंगोलीत ठिय्या आंदोलन


हिंगोली मध्ये आज मणिपूर घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आदिवासी बांधवांनी  ठिय्या आंदोलन करत महिलांवरील अत्याचाराच्या घटनेचा निषेध केला. या प्रकरणी सरकार कारवाई करत असेल तर राज्यपालांनी ते सरकार बरखास्त करावे अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. या प्रकरणी सरकार कारवाई करत असेल तर राज्यपालांनी ते सरकार बरखास्त करावे अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली होती. 


नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तीव्र आंदोलन, तळोदा शहरात आदिवासींचा मोर्चा


मणिपूर मधील आदिवासी महिलांवरील अत्याचाराविरोधात नंदुरबार जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट दिसून येत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात आली या आंदोलनात आदिवासी महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्र आणि मणिपूर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार उदयसिंग पाडवी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


तळोदा शहरात मोर्चा


मणिपूर येथे झालेल्या आदिवासी अत्याचाराचा घटनेच्या निषेधार्थ तळोदा शहर आणि तालुक्यातील आदिवासी संघटनांनी भव्य निषेध मोर्चा काढला. या निषेध मोर्चा हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते शहराच्या विविध भागातून फिरून मोर्चा तळोदा तहसील कार्यालयावर आल्यानंतर तहसीलदार आणि पोलिसांना निवेदन देण्यात आले.  



सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएमचे आंदोलन


 मणिपूर येथे झालेल्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे निदर्शने सोलापुरात निदर्शने करण्यात आली. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटातील महिला पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. मणिपूर अत्याचार रोखण्यामध्ये केंद्र सरकाला अपयश आल्याच्या आरोप आंदोलकानी केला. यावेळी केंद्र सरकाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


मणिपूर येथे मागील अनेक दिवसापासून जातीय दंगल उसळली आहे. ही दंगल रोखण्यात केंद्र आणि माणिपूर सरकार अयशस्वी ठरलं आहे. तसेच महिलावर अत्याचार झाल्यानंतर देखील अद्याप ही आरोपीना अटक करण्यात आली नाही. भाजप सरकार केवळ मतांचे राजकारण करतं असल्याचा आरोप एमआयएमने केला. दरम्यान देशभरात झालेल्या विविध दंगलीतील पीडितांचे पुनर्वसन करा, अशी मागणी देखील यावेळी एमआयएमच्यावतीने करण्यात आली.


सांगलीत विविध सामाजिक संघटना रस्त्यावर


मणिपूर येथे महिला भगिनींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात सांगलीत विविध सामाजिक संघटना तसेच विविध पक्षांच्या महिला कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार आंदोलन केले. यावेळी सांगलीतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सर्व महिलांनी एकत्र येऊन मणिपूर येथील घटनेचा निषेध केला. तसेच या घटनेला जबाबदार असणाऱ्या तसेच अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी सर्वच महिला आणि युवतींनी केली. या मोर्चामध्ये विविध राजकीय पक्ष, संघटना, महिला संघटनांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. 


गोंदियातील मोरगाव अर्जुनी येथे निदर्शने


गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी येथे समता सैनिक दल आणि युवा मित्र प्रतिष्ठानसह विविध संघटनांच्यावतीने मणिपूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी निषेध सभेत बोलतांना समता सैनिक दलाचे जिल्हाप्रमुख मिथुन मेश्राम यांनी मणिपूर राज्यातील हिंसाचार व या घटनेस राज्य व केंद्रातील सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केला. 


अमरावतीत काँग्रेसचे आंदोलन 


मणिपूर येथील हिंसाचार आणि महिला अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज अमरावती शहर महिला काँग्रेस आणि युवक काँग्रेसतर्फे अमरावतीच्या राजकमल चौक येथे निदर्शने करण्यात आली. मणिपूर पेटलेलं असताना पंतप्रधान एक शब्दही बोलत नाहीत असा आरोप यावेळी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. युवक काँग्रेसतर्फे भाजप सरकारचा निषेध करत मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लावण्याची मागणी करण्यात आली.