सिंधुदुर्गात वणवा, 500 एकरातील बागा बेचिराख, 95 शेळ्या खाक
एबीपी माझा वेब टीम | 16 Feb 2017 12:00 PM (IST)
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा तालुक्यातील डिंगणे धनगरवाडीत काल संध्याकाळी लागलेल्या वणव्यात तब्बल पाचशे एकरातील आंबा, काजू कलम बाग व अन्य झाडे वणव्यात बेचिराख झाली. अनर्थ एवढ्यावरच थांबला नाही, तर दोन घरे व बोकडांचा गोठा खाक झाला. 95 बोकडांचा अक्षरशः कोळसा झाला. डिंगणे माळरानावरील हा वणवा रोखण्याचा स्थानिक ग्रामस्थांसह पोलीस अधिकारी प्रदीप गीते व त्यांच्या सहकाऱ्यांना शर्थीचे प्रयत्न केले. या परिसरात दरवर्षी बागायतींना आग लागण्याचे प्रकार घडतात. बागायतदार शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत असते. मात्र, काल डिंगणेत लागलेली आग मोठया प्रमाणात होती. घरे, बोकडांचा गोठा, गवताच्या गंजी एका पाठोपाठ एक सारे बेचिराख होत गेले. आगीचे रौद्र पाहून हे सारे अघटित केवळ उघड्या डोळय़ांनी पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. तरीही ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता आग विझवण्याचा प्रयत्न सुरु राहिला. मात्र, दुर्दैवाने 95 बोकडे असलेला गोठा वाचवण्यात त्यांना अपयश आलं. विहिरीतून पाणी भरून बंब येईपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न ग्रामस्थ करत होते. पाचशे एकरातील आंबा, काजू कलमे, सागाची झाडे, गोठे, शेळय़ांचा गोठा, 95 शेळय़ा, घरे व घरातील वस्तू मिळून कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. यामध्ये बाळू शिंदे, कृष्णा बाबू शिंदे, रामदास शिंदे, लक्ष्मण शिंदे यांच्या गोठय़ातील 95 शेळय़ा जळून खाक झाल्या. त्यात या शेतकऱ्यांचे सुमारे 12 लाख, तर रामदास शिंदे यांचा गोठा, माड, पाचशेहून अधिक नारळ, कपडालत्ता, सामान जळून खाक झाले.